Advertisement

माझ्या शहराच्या अभिमानासाठी लढण्यापासून कुणीही रोखू शकत नाही- राऊत

बुधवारपर्यंत संजय राऊत आणि अधिकाऱ्यांना बाजू मांडण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

माझ्या शहराच्या अभिमानासाठी लढण्यापासून कुणीही रोखू शकत नाही- राऊत
SHARES

माझं शहर आणि महाराष्ट्राच्या अभिमानासाठी लढण्यापासून मला कुणीही रोखू शकत नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. कंगनाच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश देणारा अधिकारी आणि संजय राऊत यांना या खटल्यात प्रतिवादी करण्याची मागणी कंगनाच्या वकिलांकडून करण्यात आली होती. त्यावर बुधवारपर्यंत संजय राऊत आणि अधिकाऱ्यांना बाजू मांडण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. त्यावर संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (shiv sena mp sanjay raut reacts on kangana ranaut bungalow demolition case against bmc in bombay high court)

एक स्वतंत्र प्राधिकरण असलेल्या मुंबई महापालिकेने अनधिकृत बांधकामावर केलेल्या कारवाईविरोधात एका अभिनेत्रीने मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल केला असून २ कोटी रुपयांची मागणी केली आहे. शिवाय या खटल्यात मला प्रतिवादी बनवण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. बाबरी खटला ते मराठी अभिमानासाठी उभं राहताना अनेक खटले मी अंगावर घेतले आहेत. ही गोष्ट मला माझं शहर आणि महाराष्ट्राच्या अभिमानासाठी लढण्यापासून रोखू शकत नाही, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

कंगना ९ सप्टेंबर रोजी जेव्हा मुंबईत आली तेव्हा तिच्या ऑफिसचा काही भाग अनधिकृत ठरवत तोडण्यात आला. या प्रकाराविरोधात कंगनाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

हेही वाचा - कंगना आॅफिस तोडफोड प्रकरण: संजय राऊतही ओढले गेले खटल्यात

मुंबई महापालिकेने कंगना रणौतच्या वांद्रे, पाली हिल येथील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू करताच कंगनाने आपल्या वकिलांमार्फत तातडीने उच्च न्यायालयात धाव घेत कारवाईवर स्थगितीची मागणी केली होती. महापालिकेने विशिष्ट कुहेतूने बंगल्यातील बांधकामे तोडल्याचा आरोप कंगनाने वकील रिझवान सिद्दिकी यांच्यामार्फत केला होता. 

त्यानंतर न्या. शाहरुख काथावाला आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने झालेल्या तातडीच्या सुनावणीत कंगनाने केलेल्या आरोपांची दखल घेतली. विशेषत: ती घरी नसताना आणि नोटिशीला २४ तास उलटल्यानंतर महापालिकेने तातडीने केलेल्या कारवाईवर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. शिवाय महापालिकेची कारवाई प्रथमदर्शनी कुहेतूने केल्याचं दिसत असल्याचं निरीक्षण नोंदवत महापालिकेच्या कारवाईला दिलेली स्थगिती २२ सप्टेंबपर्यंत कायम ठेवली होती. 

दरम्यान, संजय राऊत यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया देताना ‘उखाड डाला’ या आशयाची प्रतिक्रिया दिल्याचे पुरावे कंगनाच्या वकिलांनी न्यायालयापुढे सादर करत तोडफोडीचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यासोबत त्यांनाही प्रतिवादी करण्याची मागणी केली होती.

मुंबई महापालिकेच्या कारवाईदरम्यान कार्यालयातील दुर्मिळ सामान, वस्तूंचं नुकसान झाल्याचा आरोप कंगनानं केला आहे. एकूण मालमत्तेच्या ४० टक्के भागाचं नुकसान झाल्याचं म्हणत कंगनाने महापालिकेकडून २ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देखील मागितली आहे.

हेही वाचा - “संजय राऊत ९९ टक्के शिवसैनिकांना खटकतात”


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा