ईडी ही राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणं काम करतेय. ज्यांचे आदेश ते पाळताहेत त्या पक्षाच्या १०० लोकांची यादी मी पाठवून देतो, असं म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेना प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी झालेल्या ईडीच्या कारवाईवर संताप व्यक्त केला.
या कारवाईनंतर मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले, ज्यांचे आदेश ते पाळत आहेत त्यांच्या १०० लोकांची यादी मी पाठवून देतो. त्यांचे काय धंदे, उद्योग आहेत, मनी लॉण्ड्रिंग कशा पद्धतीने चालतं, निवडणुकीत कुठून पैसा येतो, कसा वापरला जातो, कोणाच्या माध्यमातून येतो, बेनामी काय आहे वैगेरे याची कल्पना ईडीला नसली तरी आम्हाला आहे.
हेही वाचा- विहंग सरनाईक यांना ईडीने घेतलं ताब्यात
गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणा, न्यायव्यवस्था, कायदा हा सत्ताधाऱ्यांचा गुलाम, चाकर आणि नोकर असल्यासारखं वागत असली, तरी आम्ही त्याची पर्वा करत नाही. तुम्ही कितीही नोटीसी पाठवा, धाडी टाका, खोटी कागदपत्रं सादर करा पण विजय शेवटी सत्याचाच होईल, असं संजय राऊत म्हणाले.
प्रताप सरनाईक यांनी गेल्या काही काळात अर्णब गोस्वामी, कंगना राणौत आणि अन्वय नाईक ही प्रकरणं लावून धरली. त्या आकसातूनच त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. प्रताप सरनाईक घरी नाहीत हे पाहून धाड टाकण्यात आली. ही नामर्दानगी आहे. आमच्या प्रत्येक आमदाराच्या, खासदाराच्या आणि नेत्याच्या घरांसमोर ईडीनं कार्यालय थाटलं तरी आम्ही घाबरत नाही. हिंमत असेल तर घरी या आणि अटक करा. आम्ही लढत राहू. हे सरकार पुढील चार वर्ष नाही तर त्याहीपलीकडे जाऊन २५ वर्ष कायम राहील, असं आव्हान देखील संजय राऊत यांनी दिलं.
(shiv sena mp sanjay raut slams bjp over search operation of ed in pratap sarnaik house)