भीमा-कोरेगाव हिंसाचार घडत असताना आणि त्यानंतर मुंबईसह राज्यभर त्याचे तीव्र पडसाद उमटत असताना मौन बागळगलेल्या उद्धव ठाकरे यांनी कार्यकारिणी सभेत अखेर आपलं मौन सोडलं. ही घटना मन विषण्ण करणारी असून या हिंसाचारामागे असणारे अदृश्य हात जेव्हा सापडतील, तेव्हा ते हात तोडल्याशिवाय शिवसैनिक राहणार नाहीत, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं.
मंगळवारी वरळीतील कार्यकारणीच्या बैठकीत कार्यकर्त्यांची संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत अनेकांना टार्गेट केलं. पंतप्रधान परदेशातच असतात. बाहेरचे नेते आले की त्यांना अहमदाबादमध्ये नेतात, असं म्हणत उद्धव यांनी पंतप्रधानांच्या अहमदाबादमधील पतंगबाजीवर सडकून टीका केली. जगभरातील पंतप्रधानांबरोबर अहमदाबादमध्ये पंतग उडवण्यापेक्षा श्रीनगरमध्ये जाऊन तिरंगा फडकवला असता, तर पंतप्रधानांचा अभिमान वाटला असता, असं ते म्हणाले.
नौदलाविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचाही उद्धव यांनी खरपूस समाचार घेतला. गडकरीचं नौदलाविषयीचं वक्तव्य इतकं संतापजनक होतं की ते एेकून तळपायाची आग मस्तकात गेली. कन्नडी गौरव गीत गाणारे महसूलमंत्री चंद्रकांत पाटीलही उद्धव यांच्या निशाण्यावर राहिले. कानडी भाषेचा अनादर नाही, तर कानडी अत्याचाराला आमचा विरोध आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पाटील याचं कर्नाटकाबाबतची वक्तव्यही चीड आणणारं असल्याचं स्पष्ट केलं.
थापा मारून सत्तेत आलेलं भाजप सरकार आजही थापाच मारत असून जनतेला भुलवत आहे. सध्या थापा मारण्याचीच लाट देशात आहे. तेव्हा थापा मारण्याची ही लाट बंद करण्यासाठी देशात 'थापाबंदी' करा. जशी गोहत्याबंदी केली, तशी थापाबंदी करा. कारण गाय मारणं जसं पाप आहे, तसंच थापा मारणं देखील पाप आहे. त्यामुळे थापा मारणं हा गुन्हा ठरवून थापा मारणाऱ्यांना तुरूंगात पाठवा, असंही उद्धव यावेळी म्हणाले.
हेही वाचा-
शिवसेनेचा भाजपाला दम, २०१९ ची निवडणूक स्वबळावर लढणार
घराणेशाही नव्हे, परंपरा... सेनेच्या नेतेपदी आदित्य ठाकरेंची निवड