पश्चिम बंगालच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असताना शिवसेनेने या निवडणुकांसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका न लढवण्याचं ठरवलं आहे. यासंबंधी शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी एक ट्विट केलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार की नाही याची अनेकांना उत्सुकता लागून राहिलेली आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्याशी चर्चा केल्यानंतर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
सद्याची परिस्थिती बघता पश्चिम बंगालमध्ये ममतादीदी विरूद्ध सगळे अशी लढाई सुरू आहे. ममतादीदींविरोधात पैसा, शक्ती आणि मीडिया अशी सगळी आयुधं वापरली जात आहेत. त्यामुळे शिवसेनेने प. बंगालमध्ये निवडणूक न लढवण्याचं ठरवलं आहे. तर त्यांच्या पाठिशी ताकदीने उभी राहण्याचं शिवसेनेने ठरवलं आहे. त्या बंगालच्या खऱ्याखुऱ्या वाघिण असल्याने या निवडणुकीत त्या घवघवीत यश मिळवतील, अशा त्यांना शुभेच्छा आहेत, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.
हेही वाचा- “उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे राहुल गांधी”
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 4, 2021
मागील काही वर्षांमध्ये शिवसेनेने महाराष्ट्राची वेस ओलांडून उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यातील विधानसभा निवडणुका लढवल्या आहेत. यामध्ये भलेही शिवसेनेला अपेक्षित यश मिळालेलं नसलं, तरी हा सिलसिला कायम आहे.
त्यानुसार पश्चिम बंगालसह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय वर्तुळाचं शिवसेनेच्या (shiv sena) भूमिकेकडे लक्ष लागलं होतं. शिवसेना कुठल्या कुठल्या राज्यात निवडणूक लढवले, असे अंदाज व्यक्त केले जात होते. सोबतच शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र मतांची कुठलीही काटछाट न होण्यासाठी शिवसेनेने तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्यातरी पश्चिम बंगालमध्ये भाजप (bjp) आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेस यांच्या थेट लढत दिसत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेत प्रादेशिक पक्षांसोबत मोट बांधली आहे.
(shiv sena will not contest west bengal assembly election)