मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी गुरुवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एटीआर अर्थात कृती अहवाल विधानसभेत सादर केला. कृती अहवालाबरोबरच आरक्षणासाठीच्या कायद्याची प्रतही मुख्यमंत्र्यांकडून यावेळी सादर करण्यात आली आहे. या कृती अहवालानुसार मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याची तरतूद या विधेयकात करण्यात आल्याचं समजतं आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचं, मराठा समाजाचं आणि संघटनांचं लक्ष गुरुवारच्या अधिवेशनाकडे लागलं आहे. गुरुवारी सकाळी उपसमितीची बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कृती अहवाल सादर केला. या अहवालानुसार मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. शिक्षण आणि नोकरीत हे आरक्षण लागू होणार आहे. तर क्रिमी लेअरला मात्र आरक्षण नाही. एसईबीसी वर्गातलं आरक्षण गुणवत्तेनुसार असणार असून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू नसल्याची माहिती समोर येत आहे.
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देण्यात आल्याच यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. मराठा समाज आर्थिक, सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचा मुद्दा तपासल्याचं एटीआरमध्ये म्हटलं आहे. मराठा वर्गास एसईबीसी म्हणून घोषित करण्यात येत असल्याचंही एटीआरमध्ये नमुद करण्यात आलं आहे.
एटीआर मांडल्यानंतर सभागृहात जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या. शिवाय विधानसभेतच मराठा नेत्यांनी फेटे बांधून मिठाई वाटत आनंद व्यक्त केला. तर आता मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळणार असल्यानं मराठा समाजाची कित्येक वर्षांची मागणी मान्य होणार आहे. मात्र हे आरक्षण न्यायालयात टिकावं हीच आता सर्व मराठा समाजाची-संघटनांची मागणी आहे.
हेही वाचा-
मराठा आरक्षण Live - गुरुवारचा दिवस निर्णायक, गरज पडल्यास अधिवेशनाचा कालावधी वाढवू -सरकार
मराठा आरक्षणाचं राजकारण करू नका, आंदोलकांचा नेत्यांना इशारा