गेल्या महिनाभरापासून दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलचं तापलं होतं. अवघ्या राज्याचं लक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटाच्या मेळाव्याकडे लागलं होतं.
अखेर बुधवारी बीकेसीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा तर शिवाजी पार्कमध्ये शिवसेना (Shiv sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा पार पडला. कोणाच्या दसरा मेळाव्याला किती लोकांनी हजेरी लावली याचा अंदाज मुंबई पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला एक लाख तर शिंदे गटाच्या मेळाव्याला अंदाजे दोन लाख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
दरम्यान शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात असे काही लोकं होते ज्यांना ते इथे कशासाठी आले आहेत हेच त्यांना माहित नव्हतं, याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पोलिसांनी दिलेली आकडेवारी ही अंदाजे दिली असून त्यामध्ये तफावत असू शकते. शिवाजी पार्क आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील मैदान दोन्ही मैदानं दसरा मेळाव्यासाठी आलेल्या लोकांमुळे पूर्ण क्षणतेनं भरली होती.
दरम्यान, शिवसेनेतून गद्दारी करून गेलेल्यांची मंत्रीपदं काही वेळेपुरतीच आहेत, पण गद्दार हा शिक्का कायमस्वरुपी आहे, तो शिक्का पुसता येणार नाही असा घणाघात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. आतापर्यंत दहा तोंडाचा रावण होता, आता तो 50 खोक्यांचा बकासूर झाला असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पहिलाच दसरा मेळावा बीकेसी मैदानात पार पडला. एकनाथ शिंदेंनी दीड तासाच्या भाषणात गद्दारी आणि खोके या आरोपांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘दोन महिन्यांपासून आम्हाला खोके-खोके, गद्दार म्हटले जात आहे. होय गद्दारी झाली, पण २०१९ मध्ये. तेव्हा ज्या निवडणुका झाल्या त्यानंतरची आघाडी हीच खरी गद्दारी होती. ती बाळासाहेबांचे विचार आणि जनतेशी गद्दारी होती. आम्ही गद्दार नाही, गदर आहोत. गदर म्हणजे क्रांती. तुम्हाला ४० आमदार, १२ खासदार, १४ राज्यांतील प्रमुख आणि लाखो शिवसैनिकांनी का सोडलं? याचं तुम्ही गद्दार-गद्दार म्हणून टाहो फोडण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा.’
हेही वाचा