पुढच्या दीड - दोन महिन्यात निवडणुकीच्या मध्यावर पुलवामासारखा हल्ला घडवला जाईल, असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. शनिवारी सायंकाळी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मनसेच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टिका केली. रोज काही तरी नवीन घडावं ही मोदी सरकारची इच्छा असते, असंही त्यांनी यावेळी म्हटले.
पुलवामा येथील घटना घडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो बघा ते कसे व्यवस्थित टापटीप आहेत. आमची ४० माणसं मारली गेली. पण यांच्या चेहऱ्यावर कुठे दु:ख दिसलं का? चाळीस कुटुंबं उद्ध्वस्त झाली. देशात युद्धसदृश्य आणि हे कोरियात शांततेचे पुरस्कार घेण्यास व्यस्त. हे कसले फकीर, हे बेफिकीर आहे, अशा शब्दात राज यांनी मोदी यांच्यावर टिकास्त्र सोडलं.
राज ठाकरेंनी एअर स्ट्राइकवरून केंद्र सरकारवर टिका केली. एअर स्ट्राइक झालं त्याबद्दल वायूदलाचं कौतुकचं आहे. मात्र,सरकारकडून वायुदलाला चुकीची माहिती दिली गेली. एअर स्ट्राईकच्या किती खोट्या बातम्या दिल्या. १ हजार किलोचा म्हणे बाॅम्ब टाकले. बाॅम्ब चुकीच्या ठिकाणी नाही टाकला, तर वायुदलाला सरकारची चुकीची माहिती. पाकिस्तानची १० माणसे जरी मारली गेली असते तरी आमचा अभिनंदन परत आला नसता. त्यांची २००- २५० माणसे मेली असती तर आपला वैमानिक परत नसता आला. किती खोटं बोलायचं याला काही मर्यादा असं सांगत राज यांनी एअर स्ट्राइकवर प्रश्न उपस्थित केले.
राज यांनी राफेलवरूनही केंद्र सरकार टीका केली. राज म्हणाले की, राफेल का हा प्रश्न नाही. तर राफेलचं काम अनिल अंबानी यांना का दिलं. अंबानीला असा काय अनुभव आहे, हा आमचा प्रश्न आहे. राफेल व्यवहाराची कागदपत्रे चोरीला जात आहेत. आधी सरकार मान्य करतं की कागदपत्रे चोरीला गेली, आणि आता सांगितलं जात आहे प्रती चोरीला गेल्या.
अजित डोवल यांची चौकशी करा, बऱ्याच गोष्टी समोर येतील असं फक्त मी म्हटलं होतं. मात्र अजित डोवलबाबत बोलायची राज ठाकरेंची लायकी आहे का? असं म्हणत माझ्यावर टिका केली केली. मला याची पर्वा नाही. अजित डोवाल यांच्या मुलाची कंपनी आहे, त्यात दोन पार्टनर आहेत. एक अरब आहे दुसरा पाकिस्तानी आहे. हे भाजपाला चालतं इतर कोणी असता तर त्याला राष्ट्रद्रोही किंवा देशद्रोही ठरवले असते. राष्ट्रभक्ती आपल्याला शिकवणारे नरेंद्र मोदी कोण आहेत? असाही प्रश्न राज यांनी उपस्थित केला.
मनसे लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पण जो निर्णय घ्यायचा आहे तो योग्यवेळी घेईन. आचारसंहिता लागल्यावर याचा निर्णय जाहीर करू, असं राज यांनी म्हटलं. पक्ष स्थापनेपासून मनसे कार्यकर्त्यांनी मला चांगली साथ दिली असं सांगत वर्धापनदिन सोहळ्यात राज यांनी मनसे कार्यकर्त्यांचं कौतुक केलं.