महाराष्ट्रातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून चांगलंच तापलं आहे. शिवसेनेविरोधात बंड करून राज्याचे मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेच्या ४० आमदारांवर आदित्य ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला आहे.
राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अस्तित्वात आले आहे. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले आहे.
न्यायालयीन लढाई सुरू असतानाच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेच्या पुनर्बांधणीसाठी आदित्य ठाकरे महाराष्ट्रातील विविध भागात दौरे करत आहेत. बुधवारी आदित्य ठाकरे यांनी भायखळा आग्रीपाडा येथील शिवसेनेच्या शाखा क्रमांक 212 ला भेट दिली.
शिवसैनिकांना संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर जोरदार निशाणा साधला. आदित्य ठाकरे म्हणाले, "जे गेले ते बंडखोर नाहीत, ते देशद्रोही आहेत, त्यांनी कितीही नावे बदलली, कितीही गटबाजी केली तरी त्यांच्या डोक्यावरून गद्दाराचा शिक्का हटणार नाही."
"राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्याला आज एक महिना झाला. राग येण्यापेक्षा दुःख वाटतंय. ज्यांना भरभरुन दिलं, त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. आम्ही कुणाचं वाईट केलं नाही, म्हणून ताठ मानेने उभे आहोत," ते म्हणाले.
"गेलेले लपूनछपून, शिवसैनिकांना त्रास देत आहेत. परत येणाऱ्यांसाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत. लाज असेल तर राजीनामा द्या आणि निवडणूक लढवा. आमचा कायद्यावर विश्वास आहे. हे सरकार पडणारच. ठाकरे परिवार आणि शिवसेना संपवायला हे निघाले आहेत," असंही ते म्हणाले.
भाषणाच्या वेळी जोरदार पाऊस सुरु होता, आणि या भरपावसात त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला.