Advertisement

सांगलीतून निघणार 'ट्रॅक्टर मोर्चा'; राजू शेट्टी होणार सहभागी

या मोर्चाला शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी सांगलीतून ट्रॅक्टर मोर्चा काढून या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

सांगलीतून निघणार 'ट्रॅक्टर मोर्चा'; राजू शेट्टी होणार सहभागी
SHARES

मागील २ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी सोमवारी मुंबईत शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा निघाला. किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा रविवारी दक्षिण मुंबईतील आझाद मैदान इथं दाखल झाला. विविध वाहनांतून हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले असून, सोमवारी जाहीर सभेनं शेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाच्या दिशेनं निघणार आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वीच आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. तसंच, या मोर्चाला शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी सांगलीतून ट्रॅक्टर मोर्चा काढून या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

राज्यातील विविध शेतकरी संघटना या आंदोलनात सहभागी होत असून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन आहे. सांगलीतील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन सांगलीतून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा ट्रॅक्टर मोर्चा कोल्हापूरच्या दिशेनं येणार आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं ट्रॅक्टरसह शेतकरी यामध्ये सहभागी होतील, असं राजू शेट्टी यानी म्हटलं. शिवाय, 'गेल्या जून महिन्यांपासून आम्ही सातत्यानं या तिन्ही कृषी कायद्याला विरोध करत आहोत, त्यामुळं कुणाच्या पाठिंब्याची अपेक्षाच आम्ही करत नाहीत, असं म्हणत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची अपेक्षा नसल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं.

विरोधी पक्षांचा आंदोलनातील सहभाग पूर्ण ताकदीनिशी नसल्यानं आपण नाराज असल्याचंही शेट्टी यांनी स्पष्ट केलं. देशभरातून शेतकरी मोठ्या संख्येनं व ताकदीनं आंदोलनात सहभागी होत आहे, पण विरोधी पक्ष प्रभावीपणे दिसत नाही. स्वामीनाथन आयोगानुसार हमी भाव देण्याची, ऊसाला एफआरपी देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. पण, सरकार याकडे लक्ष देत नसून कुणीही मागणी न केलेले कायदे अस्तित्वात आणले आहेत. केवळ, कार्पोरेट उद्योजकांसाठी, अदानी-अंबानींसाठी हे कायदे करण्यात आल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला.

प्रजासत्ताक दिनाबरोबर मुंबईत धडकलेल्या किसान मोर्चासाठी मुंबईत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच अतिरिक्त फाैजफाट्यासह ड्रोनच्या मदतीने या मोर्चावर पोलीस लक्ष ठेवून आहेत. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान मोर्चा सोमवारी राजभवनावर धडकणार आहे. रविवारी हा मोर्चा नाशिकहून मुंबईत दाखल झाला आहे.

आझाद मैदान इथं राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांचा मुक्काम आहे. या परिसरातही पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर १०० अधिकारी ५०० अंमलदारांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात आहे. तसेच एसआरपीएफच्या नऊ तुकड्या त्यांच्या दिमतीला तैनात असून ड्रोनद्वारे सर्व हालचालीवर पोलीस लक्ष ठेवून असणार आहे. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त ठिकठिकाणी गस्त वाढविण्यात आली आहे. राज्य दहशतवादविरोधी पथकही  घडणाऱ्या सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा