Advertisement

राज्यात बदली घोटाळा, सीआयडी चौकशी करा- भाजप

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी १५ टक्के बदल्यांच्या नावाखाली मर्जीतील अधिकाऱ्यांकडून प्रचंड पैसे लाटले आहेत.

राज्यात बदली घोटाळा, सीआयडी चौकशी करा- भाजप
SHARES

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी १५ टक्के बदल्यांच्या नावाखाली मर्जीतील अधिकाऱ्यांकडून प्रचंड पैसे लाटले आहेत. त्यामुळे या बदली घोटाळ्याची सीआयडी चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. (transfer scam in maha vikas aghadi government alleges bjp maharashtra president chandrakant patil)

कोरोनाविषयीच्या उपाययोजनात सातत्य राखण्यासाठी राज्य सरकारच्या अर्थ विभागाने ४ मे रोजी एक शासन निर्णय काढला होता. त्यात चालू आर्थिक वर्षात कोणत्याही संवर्गातील अधिकारी अथवा कर्मचारी यांची बदली करू नये, याविषयीचा आदेश सामान्य प्रशासन विभागामार्फत देण्यात येईल, असं म्हटलं होतं. तरीही जुलै महिन्यात राज्यात कोरोनाचं संकट वाढलेलं असताना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सामान्य प्रशासन विभागाने अर्थ विभागाच्या ४ मे रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने ७ जुलै रोजी आदेश काढला व ३१ जुलैपर्यंत १५ टक्के बदल्या कराव्यात असं स्पष्ट केलं. तसंच २३ जुलै रोजी आणखी एक आदेश काढून या निर्णयाला १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. 

हेही वाचा - Ganesh Festival 2020: कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांना टोल माफ, सरकारचा निर्णय

राज्य सरकारच्या या धोरणातील गोंधळामुळे कोरोनाचे संकटात मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबाचं स्थलांतर करावं लागलं. कोरोनामुळे शाळा बंद असताना मुलांसाठी नव्या ठिकाणी शाळेत प्रवेश मिळविण्याचं आव्हानही निर्माण झालं. परिणामी कोरोनाची साथ रोखण्याच्या प्रयत्नांमध्येही अडथळा आला, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. 

या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी १५ टक्के बदल्यांच्या नावाखाली अनेक मलाईदार ठिकाणी मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करून प्रचंड पैसा गोळा केला. त्यामुळे या घोटाळ्याची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी देखील चंद्रकांत पाटील यांनी केली. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा