खड्ड्यामुळं वाहन अपघात होऊन नवी मुंबईत एक पोलीस कर्मचारी आणि एका महिलेनं जीव गमावल्याची घटना ताजी असतानाच मुसळधार पावसानंतर मुंबईतील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यातच मुंबईतील पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले केंद्रीय रस्ते दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना मुंबईतील खड्ड्यांवरून प्रश्न विचारताच त्यांनी 'मुंबईतले रस्ते माझ्या अखत्यारीत येत नाहीत, हे माझं दुर्दैव आहे', असं म्हणत महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला अप्रत्यक्ष चिमटा काढला.
जिथं जास्त पाऊस पडतो तिकडच्या रस्त्यावरील डांबर टिकत नाही. मात्र मी केलेले रस्ते दोन ते तीन दशक तरी टिकतात. मुंबईतील एकही रस्ता माझ्या अखत्यारीत येत नाही, हे माझं दुर्दैव आहे, असं गडकरी म्हणाले.
मी भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष असताना महापौर बंगल्यावर माझी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मुंबईतील रस्त्यांबाबत चर्चा झाली होती. आता तर मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी परदेशी पद्धत देखील वापरली जाते, असं गडकरी म्हणाले खरे, पण परदेशी पद्धत वापरूनही मुंबईच्या रस्त्यावर खड्डे कसे पडतात? असा प्रश्नही या यानिमित्तानं उपस्थित झाला.
विशेष म्हणजे रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी मुंबई महापालिकेनं मदत मागितली, तर मी नक्की मदत करेन, असं देखील गडकरी जाता जाता म्हणाले.
हे देखील वाचा -
नितिन गडकरींचा 'मॅनेजमेंट' फंडा!
शिवसेना टक्केवारीवर जगते - गडकरी
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)