पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने महात्मा गांधी यांच्या ‘राष्ट्रनिर्मितीसाठी खादी’ या मंत्राला ‘राष्ट्र परिवर्तनासाठी खादी’ असा मंत्र देऊन खादीला जगातील ६० देशांपर्यंत पोहचविले अाहे. लवकरच खादी १५० देशांपर्यंत पोहचेल असा विश्वास केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी व्यक्त केला. सिंह यांच्या हस्ते खादी फेस्ट २०१८ प्रदर्शनाचं उद्घाटन मंगळवारी पार पडलं. यावेळी ते बोलत होते. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून ग्रामोदय, ३, इर्ला रोड, विलेपार्ले (प.) येथे आयोजित केलेलं हे प्रदर्शन१ नोव्हेंबपर्यंत सुरू राहणार आहे.
महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचं औचित्य साधून खादी उत्पादनांच्या निर्मितीला चालना मिळावी यासाठी मुंबईत ‘खादी फेस्ट २०१८’ प्रदर्शन भरविण्यात आलं आहे. महोत्सवात विविध राज्यांतील कुटिरोद्योगांतून निर्मित खादीचे कपडे, खादी सिल्कच्या साड्या, ड्रेस मटेरिअल, कुर्ते, जॅकेट्स, बेडशीट्स, कार्पेट्स यांबरोबरच रसायनमुक्त शाम्पू, मध व इतर घरगुती वस्तू आणि कला व कारागिरीच्या वस्तू उपलब्ध आहेत. जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतच्या १०० संस्थांनी प्रदर्शनात सहभाग नोंदविला आहे.
यावेळी केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच खादीचा वापर करा असं आवाहन केलं आहे. त्यामुळे खादीला देशभरात खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. खादी व्यवसायातदेखील वाढ पहायला मिळत आहे. गावांमध्ये खादी आणि गाय याचा चांगला उपयोग रोजगार निर्मितीसाठी होत आहे. शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होतो. खादी जगात पोचवण्यासाठी अशी जगभर प्रदर्शने भरविण्यात येणार आहेत. यामधून खादीची मागणी वाढणार आहे.
हेही वाचा -
डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची कमी? आनंदराज आक्रमक, आंदोलनाचा इशारा
मुंबईत राष्ट्रवादीचं सरकारविरोधात मौनव्रत