दादर येथील इंदू मिल इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकांतर्गत डॉ. आंबेडकर यांचा ३५० फुटांचा पुतळा उभारण्यात येणार होता. मात्र राज्य सरकारने, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा ( एमएमआरडीए)ला निर्देश देऊन या पुतळ्याची उंची कमी केल्याची माहिती रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आंनद राज आंबेडकर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. उंची कमी केल्याने नाराज झालेले आंबेडकर आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उंचीवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याची उंची राज सरकारने कमी केल्याचं म्हणत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. त्यानुसार सरकारने डाॅ. आंबेडकर स्मारकाच्या उंचीत घोळ केल्याचं आनंदराज यांचं म्हणणं आहे. मूळ आराखड्यात पुतळ्याची प्रस्तावीत उंची ३५० फूट आहे. पण आपण स्मारकाच्या कामाचा नुकताच आढावा घेतल्यावर पुतळ्याची उंची ३५० फुटांवरून २५० फूट केल्याचं दिसून आल्याचं आनंदराज यांनी सांगितलं.
स्मारकाचा खर्च वाढत असून हा खर्च सध्या ७५० कोटी रुपयांच्या घरात गेला आहे. असं असताना उंची का आणि कशी कमी केली? असा प्रश्न उपस्थित करत या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. याप्रकरणी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. या भेटीत उंचीचा प्रश्न निकाली निघाला तर ठीक नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा देखील आनंदराज यांनी दिला.
पुतळ्याची उंची हा मुद्दा महत्वाचा आहे. कारण 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी'प्रमाणे या पुतळ्याची ओळख निर्माण करणं ही आंबेडकरी जनतेची मागणी आहे. त्यामुळेच पुतळ्याची उंची जास्त ठेवण्यात आली होती. तरीही मनमानीपणे कुणालाही विश्वासात न घेता निर्णय घेतले जात असल्याबद्दल आनंदराज यांनी नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा-
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक २०२० पर्यंत उभारणार - मुख्यमंत्री
डाॅ. आंबेडकर स्मारकासाठी ११६ झाडांचा बळी?