मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांना महाड न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते. पोलिसांनी राणे यांची ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. परंतु, न्यायालयानं दोन्ही बाजूंनं युक्तीवाद ऐकून राणेंना जामीन मंजूर केला आहे.
नारायण राणे यांना गोळवलीमध्ये अटक केल्यानंतर महाड इथं आणण्यात आलं. त्यानंतर महाड न्यायदंडाधिकारी बाबासाहेब पाटील यांच्यासमोर सुनावणी पार पडली. यावेळी, राणे यांचे कुटुंबीय सुद्धा न्यायालयात हजर होते.
यावेळी पोलिसांनी राणे यांची ७ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. परंतु, नारायण राणे यांचे वकील आदिक शिरोडकर यांनी युक्तिवाद केला. नारायण राणे यांचं वय आणि प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना जामीन द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
राणेंना कोणती औषधे सुरू आहेत याबाबत वकिलांनी न्यायालयात माहिती दिली. यासोबत प्रकृती पाहता जामीन द्यावा अशी विनंती केली आहे. राणेंना मधुमेह, उच्चरक्तदाबाचा त्रास आहे, यावर त्यांची औषध सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली.
तसंच, नारायण राणे यांना अटक करण्यापूर्वी कोणतीही नोटीस देण्यात आली नसल्याचं राणेंच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं.
नारायण राणेंना जामीन मंजूर झाल्यानं महाड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु, राणे यांच्या बचावासाठी मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते सुद्धा महाड शहरांमध्ये दाखल झाले आहेत.
रत्नागिरी, रायगड, मुंबई या विविध भागातून राणेसमर्थक मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये दाखल झाल्यानं पुन्हा एकदा शिवसैनिक भाजपचे कार्यकर्ते समोर समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा