मुंबई - काँग्रेसमधल्या संजय निरूपम आणि गुरूदास कामत गटातले वाद सध्या सर्वच मुंबईकर पहात आहेत. पण आता या वादाचाच फायदा भाजपाने घ्यायला सुरुवात केली आहे. याच धोरणाचा भाग म्हणून भाजपाने माजी आमदार कृष्णा हेगडेंसारखा मोठा मासा आपल्या जाळ्यात ओढण्यात यश मिळवले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कारभाराला कंटाळून काँग्रेसला रामराम करत असल्याचं कृष्णा हेगडेंनी सांगितलंय. आता कृष्णा हेगडे यांनी केलेल्या आरोपाला काँग्रेसच्या माजी खासदार गुरुदास कामत यांनी देखील दुजोरा देत संजय निरुपम यांच्यावर निशाणा साधला.
गटबाजी नव्हे तर मतभेद - अशोक चव्हाण
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पक्षात गटबाजी नव्हे तर मतभेद असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच याची आता पक्षश्रेष्ठींनीही दखल घेतली असेल आणि लवकरच हे वाद मिटतील असंही मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांनी सांगितलं.