वरळीत झालेल्या सिलिंडर स्फोटात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेप्रकरणी वरळी विधानसभेचे आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे. नितेश राणे यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे.
"वरळीत सिलिंडर स्फोट झाला होता. या दुर्घटनेतील तिसऱ्या व्यक्तीचा सोमवारी मृत्यू झाला. आधी लहान मुलाचा त्यानंतर त्याच्या वडिलांचा आणि आता त्याच्या आईचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. ही अत्यंत दुर्देवी आणि वेदनादायी घटना आहे. स्थानिक आमदार आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे," अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
३० नोव्हेंबर रोजी वरळीच्या गणपतराव जाधव मार्गावरील बीडीडी चाळ क्रमांक ३ मध्ये सिलिंडर स्फोट झाला होता. त्यात चार जण होरपळले होते. यातील काही जणांना नायर तर काही लोकांना कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
उपचार सुरू असताना मंगेश पुरी या चार महिन्याच्या बाळाला १ डिसेंबर रोजी मृत घोषित करण्यात आले होते. त्यानंतर आनंद पुरी (वय २७) यांचा ४ डिसेंबर रोजी उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. तर विद्या पुरी (वय २५) यांचा काल मृत्यू झाला होता.
तर या दुर्घटनेत एक ५ वर्षांचा मुलगा १५ ते २० टक्के होरपळला आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
दरम्यान, वरळी दुर्घटनेतील बालकावर नायर रुग्णालयात वेळीच उपचार मिळाले नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला होता.
"सिलेंडर स्फोटातील जखमींना नायर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका बाळाचा मृत्यू झाला आणि आता बाळाच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला आहे," असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला होता.
ते पुढे म्हणाले की, मुंबईच्या महापौर घटनेनंतर ७२ तासांनी महापौर रुग्णालयात पोहचल्या. ७२ तास कुठे झोपला होतात? मुंबई पालिकेत चाललंय काय? असा सवाल उपस्थित केला.
हेही वाचा