एखादा लग्न समारंभ किंवा वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान अनेकदा उरलेलं अन्न फेकून दिलं जातं. पण, आता तसं होणार नाही. कारण, मुंबईत सुरू असलेल्या रोटीबँक ही सेवा आता २४ तास सुरू करण्यात आली आहे.
सध्या मुंबईची एकूण लोकसंख्या पाहता रस्त्यावर, फुटपाथवर राहणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. या परिस्थितीला बदलण्यासाठी डबेवाला असोसिएशनचे सचिव सुभाष तळेकर आणि त्यांच्या डबेवाले सहकाऱ्यांनी पुढाकार घेत रोटी बँकेची स्थापना केली. आणि त्यातून भुकेलेल्यांची भूक भागवण्याचा प्रयत्न करत आहेत.
आतापर्यंत डबेवाले सायकलवरून मुंबईत डबे पोहोचवण्याचं काम करत होते. पण, आता या डबेवाल्यांना जेवण पोहचवण्यासाठी एक चारचाकी देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आणि रोटी बँकेचे आधारस्तंभ असलेले सुभाष तळेकर यांच्या हस्ते या रोटी बँकेच्या गाडीचं अनावरण केलं गेलं.
ही गाडी प्रामुख्याने दक्षिण मुंबईत कार्यरत राहणार आहे. त्यानंतर, मुंबई पूर्व उपनगर, मुंबई पश्चिम उपनगरात, टप्प्याटप्प्याने या गाड्या कार्यरत होतील. या गाड्यांवर काम करणारे स्वयंसेवक असून ते प्रामुख्याने सायंकाळी ४ ते रात्री १२ या वेळेत काम करणार आहेत. या गाड्या मिळाल्यामुळे रात्रीचंही जेवण शिल्लक राहीले तरी ते आता स्वयंसेवकांना घेता येणार आहे.
जर तुमच्याकडे अन्न शिल्लक राहिलं आणि ते तुम्हाला डब्बेवाल्यांना द्यायचं असल्यास तुम्ही रोटी बँकेच्या ८६५५५८०००१ या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधू शकता. किंवा www.rotibankindia.orgया संकेतस्थाळालाही भेट देता येईल.