शरीरसौष्ठवातही 'जो जीता वहीं सिकंदर' असतो आणि जिंकणं माझ्या रक्तात भिनलंय. मी आजवर कधीही विजयानं हुरळून गेलो नाही आणि आता मला कुणाचीही भीती वाटत नाही. मी गेले चार महिने घाम गाळलाय, पुण्यातही मी माझी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठीच उतरणार आहे. रोहा आणि गुरगावपाठोपाठ मला आता पुणंही जिंकायचं अाहे. शरीरसौष्ठवात नशीबाच्या जोरावर कुणी जिंकत नाही, इथे फक्त कामगिरीच बोलते आणि येत्या रविवारी मीसुद्धा मिस्टर इंडिया किताबाची हॅटट्रिक साजरी करण्यासाठी उतरणार आहे, असा ठाम विश्वास सलग दोनवेळा मिस्टर इंडिया किताब जिंकणाऱ्या सुनीत जाधवने बोलून दाखवला.
२३ ते २५ मार्चदरम्यान पुण्याच्या बालेबाडीत भारतातील ६०० शरीरसौष्ठवपटू विजेतेपदासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचाही सर्वात बलशाली संघ सज्ज झाला आहे. महेंद्र चव्हाण, सागर कातुर्डे, अक्षय मोगरकर, सुजन पिळणकर, अतुल आंब्रे, नितीन म्हात्रे, रोहित शेट्टी आणि महेंद्र पगडेसारखे महाराष्ट्राचे खेळाडू सुवर्णमयी कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दिग्गज खेळाडूंनी पुण्यात महाराष्ट्राचाच जयघोष होणार, असल्याची ग्वाही दिली.
शरीरसौष्ठवावर लोकांचं प्रेम आधीपेक्षाही खूप वाढलंय. आमच्या खेळाला लोकाश्रय तर मिळाला पण राजाश्रय मिळण्याची आम्ही वाट पाहतोय. आमचा खेळ ऑलिम्पिकमध्ये नसल्यामुळं सरकारकडून अपेक्षित मदत मिळत नाही. पण लोकमान्य असलेला हा खेळ लवकरच राजमान्य होईल आणि जगमान्यही होईल. सरकार दरबारी आमच्या खेळाला सन्मानाचे स्थान मिळेल. तो दिवस आता फार दूर नाही, असंही सुनीत म्हणाला.
'भारत श्री' स्पर्धेत पदक जिंकणे हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असते. जेतेपदाच्या लढतीत माझ्यासमोर जावेद खान, रामनिवास, महेंद्र पगडे, दयानंद सिंगसारखे दिग्गज आहेत. कोण किती तयारीत आहे, याची मला कल्पना नाही, पण मी माझ्या सर्वोत्तम तयारीत आहे. महाराष्ट्राचा संघही तयारीत आहे. यजमान महाराष्ट्राचे अ आणि ब असे दोन संघ उतरणार आहेत, असंही सुनीत जाधवनं सांगितलं.
हेही वाचा -
भारत श्री स्पर्धेत मुंबईकरांवर सर्वांच्या नजरा
'भारत श्री' विजेत्यांना मिळणार ५० लाखांची बक्षिसं