सुप्रसिद्ध लेखक वसंत सबनीस यांनी लिहीलेलं ‘मामला चोरीचा’ हे नाटक तीन दशकांनी पुन्हा रसिकांच्या भेटीला येत आहे.
सबनीसांच्या लेखणीतून अवतरलेलं हे स्वतंत्र सामाजिक विनोदी नाटक ३२ वर्षांनी नव्या रूपात, नव्या संचात पुन्हा एकदा रंगमंचावर येणार आहे. श्री साई प्राॅडक्शन व स्पंदन निर्मिती असलेल्या या नाटकाचं दिग्दर्शन मंगलदास माने यांनी केलं आहे.
‘मामला चोरीचा’ या नाटकाचा पहिला प्रयोग ६ मे १९८५ रोजी बालगंधर्व नाट्यमंदिर, पुणे इथं झाला होता. २४ जून रोजी म्हणजेच येत्या रविवारी सातारा रोडवरील आण्णाभाऊ साठे नाट्यगृहात नव्या संचातील या नाटकाचा पहिला प्रयोग रंगणार आहे.
दामू केंकरे दिग्दर्शित जुन्या नाटकामध्ये शरद तळवळकर, आश्विनी देसाई यांनी भूमिका साकारल्या होत्या. नव्या रूपातील नाटकात आदर्श गायकवाड, सागर पवार, संजय देवळे, केतकी लांडे, ऐश्वर्या कुलकर्णी, संजय चव्हाण आणि विद्या भागवत हे कलाकार आहेत. माने यांनी यापूर्वी ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘सखाराम बाईंडर’, ‘ह्यांचं हे असंच असतं’, ‘जमलं बुवा एकदाचं’ या नाटकांचं दिग्दर्शन केलं आहे.
सबनीस यांच्या या नाटकामध्ये नवऱ्याला मुठीत ठेवणारी पत्नी आणि एकूणच घराला जेरबंद करणाऱ्या कमलादेवी शेलार यांची जिरवण्याचा प्रयत्न सुंदररित्या रंगवलेला आहे. कमलादेवींचा घरात दरारा असल्यामुळे त्यांचे पती भाऊराव, मुलगा शंतनू आणि मुलगी शीतल हे तिघेही कमलादेवीच्या अधिकाराखालील हुकूमशाहीत वावरत असतात.
दिग्दर्शक मंगलदास माने म्हणाले की, पिढ्या न पिढ्या बदलल्या तरी कुटुंबातील आई ही आईच असते. आजच्या पिढीमध्ये आईची भूमिका बदलत चालली आहे. आईने आपल्या मुलांना मोकळीक द्यावी की धाकात ठेवावं हा विचार सर्व पालक करीत आहेत. अशातच सबनीस यांचं हे नाटक नव्या रुपात रंगमंचावर सादर करण्याची कल्पना सुचली.
हेही वाचा-
Exclusive: ४ वर्षे होतात कुठे ? लता नार्वेकरांची विनोद तावडेंवर आगपाखड