Advertisement

एमयूटीपी प्रकल्पांसाठी केवळ 'इतक्या' कोटींचा अतिरिक्त निधी

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) ‘एमयूटीपी’तील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी मोठ्या निधीची अपेक्षा असतानाही यंदाच्या अर्थसंकल्पातून फक्त ६५० कोटी रुपये मिळाले आहेत

एमयूटीपी प्रकल्पांसाठी केवळ 'इतक्या' कोटींचा अतिरिक्त निधी
SHARES

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) ‘एमयूटीपी’तील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी मोठ्या निधीची अपेक्षा असतानाही यंदाच्या अर्थसंकल्पातून फक्त ६५० कोटी रुपये मिळाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ १०० कोटी रुपये अतिरिक्त निधी मिळाला आहे. राज्यातील विविध प्रकल्प व अन्य कामांसाठी ७ हजार १०७ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. यात इंदौर ते मनमाड व्हाया मालेगाव, अहमदाबाद ते बीड-परळी ते वैजनाथ नवीन मार्गिकेच्या कामांसाठी मात्र मोठी तरतूद आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या महत्त्वाच्या व जुन्या प्रकल्पांना गती देण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने केंद्राकडे मोठ्या निधीची मागणी केली होती. ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग, ऐरोली ते कळवा उन्नत मार्गिका, पनवेल ते कर्जत उपनगरीय मार्ग, विरार ते डहाणू चौपदरीकरण, सीएसएमटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग, मुंबई सेन्ट्रल ते बोरिवली सहावा मार्ग यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे.

या प्रकल्पांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ६५० कोटी रुपयांची तरतूद केली असून, राज्य सरकारकडूनही उर्वरित ६५० कोटी रुपये मिळतील, अशी माहिती एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक रवी शंकर खुराणा यांनी दिली. गेल्या वर्षी अर्थसंकल्पात ५५० कोटी रुपये मिळाले होते, तर उर्वरित ५५० कोटी राज्य सरकारकडून प्राप्त झाले होते. दरम्यान, भूसंपादन व निधीमुळे हे रेल्वे प्रकल्प पुढे सरकू  शकलेले नाहीत.

मध्य रेल्वेला ११५ सरकते जिने उभारणीसाठी ५० कोटी रुपये मिळाले असून यातील ५० टक्के जिने हे मुंबईतील स्थानकात आहेत. ७ उड्डाणपुलांच्या कामासाठी ३५ कोटी रुपये मिळाले आहेत, तर पादचारी पूल व अन्य कामांसाठी २० कोटी रुपये मिळाल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केलं. तर आणखी काही छोठ्या कामांसाठीही तरतूद केली आहे.

मुंबईसह राज्यातील नवीन मार्गिकांचे काम, दुहेरी मार्ग व अन्य सोयीसुविधांच्या कामांसाठी ७ हजार १०७ कोटी रुपये महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून मिळाले आहेत. २००९ ते २०१४ च्या तुलनेत यंदा ५०७ कोटी रुपये जादा निधी मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. यात इंदौर ते मनमाड व्हाया मालेगाव या ३६८ किलोमीटर नवीन मार्गिकेसाठी ९ हजार ५४७ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तसेच अहमदनगर ते बीड ते परळी वैजनाथसाठी ५२७ कोटी रुपये आणि वर्धा ते नांदेड व्हाया मालेगावसाठी ३४७ कोटी रुपये देण्यात आले असून, सोलापूर ते उस्मानाबाद मार्गिकेसाठीही तरतूद केली आहे.

कल्याण ते कसारा तिसऱ्या मार्गिकेच्या रेल्वे प्रकल्पासाठी यंदाच्या अर्थसंकल्पातून १६८ कोटी २४ लाख रुपये देण्यात आले आहेत. गेल्या वर्षी या प्रकल्पासाठी ५५ कोटी रुपये मिळाले होते. पनवेल ते कळंबोली कोचिंग टर्मिनससाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, गेल्या वर्षी ८ कोटी रुपये देण्यात आले होते.



हेही वाचा -

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शिवसेना करणार राज्यव्यापी आंदोनल

पुढील महिनाभरात सर्व टोल नाक्यांवर १०० टक्के फास्टॅगची अंमलबजावणी


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा