देशातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे येत्या १२ ऑगस्टपर्यंत नियमित स्वरूपात धावणाऱ्या मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर ट्रेन, मेट्रो, लोकल ट्रेनची वाहतूक बंदच ठेवण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने (all regular mail express passenger and suburban services cancelled till 12 august only specials trains to continue says railway board ) घेतला आहे. १२ ऑगस्टपर्यंत तिकीटाचं आरक्षण केलेल्या प्रवाशांना या तिकीटाचा १०० टक्के परतावा देण्यात येईल असं देखील बोर्डाने स्पष्ट केलं आहे. या निर्णयामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतरांसाठी मुंबईतील लोकल रेल्वेची वाहतूकही बंद राहणार आहे.
याआधी रेल्वे मंत्रालयाने १३ मे रोजी जारी केलेल्या परिपत्रनुसार ३० जूनपर्यंत नियमित रेल्वे वाहतूक बंद ठेवण्याचं नमूद केलं होतं. तर १४ एप्रिल किंवा त्यापूर्वी आरक्षित केलेल्या तिकीटांचे पूर्ण पैसे प्रवाशांना परत करण्यात येतील, असं देखील म्हटलं होतं. त्याप्रमाणे रेल्वेचा राज्यांतर्गत प्रवासही बंदच आहे. आता नव्या आदेशानुसार नियमित रेल्वे वाहतूक १२ ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहे. पण यादरम्यान केवळ राजधानी विशेष ट्रेन आणि १ जूनपासून सुरू असलेल्या मेल, एक्स्प्रेस अशा विशेष ट्रेन सुरूच राहतील, असं रेल्वे बोर्डाने स्पष्ट केलं आहे.
All regular mail/express, passenger & suburban services cancelled till Aug 12. 230 specials, trains for essential workers on: Railway Board
— Press Trust of India (@PTI_News) June 25, 2020
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २५ मार्चपासून मुंबईतील उपनगरीय लोकल सामान्यांसाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या. केवळ रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल चालवण्यात येत होत्या. परंतु महाराष्ट्र सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत लाॅकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल चालवण्यास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली होती. त्यानुसार पश्चिम आणि मध्य रेल्वेवर ३६२ विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येत आहेत. परंतु रेल्वे बोर्डाने निर्णयामुळे इतर कर्मचाऱ्यांना बेस्ट, एसटी व खासगी बसनेच प्रवास करावा लागेल.