मुंबई लोकल आणि बेस्ट बस पाठोपाठ काळी-पिवळी टॅक्सी ही मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा होती. या काळी-पिवळी टॅक्सीनं थोडे जास्त पैसे मोजून प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवास करता यायचा. त्यामुळे एकेकाळी मुंबईकर प्रवाशांचा या काळी-पिवळी टॅक्सीला चांगला प्रतिसाद मिळायचा. पण, बदलत्या काळात ओला, उबर या खासगी वाहतूक कंपन्यांनी उभं केलेलं तगडं आव्हान आणि काळी-पिवळी टॅक्सीवाल्यांकडून प्रवाशांना मिळणारी वाईट वागणूक याचा मोठा परिणाम काळी-पिवळीच्या व्यवसायावर झाला आहे. त्यावर उतारा म्हणून आता टॅक्सी चालक-मालकांनी भाडेवाढ मिळावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे. ही मागणी विचारात घ्यायला हरकत नाही, पण प्रवाशांना या बदल्यात मिळणार काय? असा प्रश्न उपस्थित करत एकतर वागणूक सुधारा किंवा मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून हद्दपार व्हा, असं म्हणायची वेळ प्रवाशांवर आली आहे.
दिवसेंदिवस मुंबईतल्या काळी-पिवळी टॅक्सी चालकांची मुजोरी वाढत चालली आहे. रस्त्यावर उभं राहून नजरेसमोरून जाणाऱ्या टॅक्सीला हात दाखवला की रिकामी असूनही थांबेल याची काही शाश्वती नाही. मग तुम्ही कितीही घाईत असा. तुमचं नशीब चांगलं असेल आणि चुकून आपल्या पहिल्याच हाकेला टॅक्सीचालकाने टॅक्सी थांबवली, तर प्रवासाआधीचा पहिला टप्पा संपून तुम्ही दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करतात. हा टप्पा असतो, टॅक्सी चालक आपल्याला गाडीत बसवेल की नाही याचा. कुठं जायचं असं दरडावून विचारणारा हा टॅक्सीचालक गाडीत बसण्याआधीच आपल्या मनात दहशत निर्माण करतो. माझ्या रस्त्यावर तुमचा स्टाॅप असेल तर ठिक किंवा लांबचं भाडं असेल, तरच आता घुसायला देईन नाहीतर, गेलात उडत म्हणत आपल्या तोंडावर धूळ उडवून हा केव्हा पसार होतो आपल्याला कळत देखील नाही. टॅक्सी चालकांचा भाडं नाकारण्याचा आणखी एक बहाणा म्हणजे गाडीला जेवायचंय (गॅस संपलाय) किंवा मला जेवायला जायचंय.
प्रवाशांना प्रवासादरम्यान सामान न्यायचे असेल तर प्रवासी शक्यता कॅरिअर असलणाऱ्या टॅक्सीनं प्रवास करतात. मात्र, सध्या मुंबईतील रस्त्यावर सन्ट्रो गाडीच्या प्रकारातील टॅक्सी धावत असून त्यांच्यात अवजड सामाना वाहून नेण्याची क्षमता नाही आहे. त्यामुळं प्रवाशांची मोठी गैर सोय होतं आहे. त्यामुळं अवजड सामानासाठी प्रवासी ओमनी प्रकारातील टॅक्सीचा वापर करतात. परंतु, यामधील अर्ध्यापेक्षा जास्त टॅक्सी शेअर टॅक्सीच्या स्वरुपात सुविधा पुरवत असल्यानं प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोर जावं लागतं.
एकीकडं टॅक्सी चालकांच्या या अपुऱ्या सेवेमुळं प्रवाशी संताप व्यक्त करत आहेत. तर, दुसरीकडं टॅक्सी चालक-मालक संघटना भाडेवाढीची मागणी करत आहेत. सध्या टॅक्सीचं किमान भाडं २२ रुपये आहे. हे वाढवून ३० रुपये करण्याची मागणी त्यांनी केली. त्यासाठी त्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना पत्रही पाठवलं होतं. परंतु त्यांच्या या भाडेवाढीच्या मागणीवर सामान्या नागरिक 'भाडेवाढ काय मागता?, मुजोरी, आवाजावी भाडं घेणं, भाडं नाकारण्याबद्दल बोला', असं बोलत आहेत. 'सतत भाडेवाढीची मागणी करायची पण प्रवाशांना सेवा पुरवायची नाही, प्रवाशांशी गैरवर्तन करायचं, जवळचं भाडं असेल तर थेट नकार देऊन जायचं, मग यांना भाडेवाढ कशासाठी पाहिजे' अशा शब्दांत प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.
मुंबईत बदलत्या काळानुसार ओला आणि उबर ही खासगी ऑनलाईन वाहतूक सेवा सुरू झाली. त्यामुळं प्रवाशांना घरबसल्या एका क्लिकवर प्रवासाची संधी मिळते. परंतु, यांचं भाडं काळी-पिवळी टॅक्सच्या तुलनेत जास्त असली तरी प्रवाशांचा या सुविधेला प्रचंड प्रतिसाद आहे. अॅपबेस टॅक्सी चालकांच्या या सुविधेमुळं काळी-पिवळी टॅक्सी चालकांच्या व्यवसायावर गदा आल्याचं मत या टॅक्सी चालक-मालकांच आहे. त्यामुळं त्यांनी ही अॅपबेस टॅक्सी सुविधा बंद करण्याची मागणी केली. या मागणीसाठी त्यांनी मुंबईत अनेकदा आंदोलनं केली, संप पुकारले. यावेळी प्रवाशांची गैस सोय झाली, मात्र त्यावेळी 'हे सेवाच पुरवत नसतील तर यांनी भाडेवाढ कशाला पाहिजे' असं मत प्रवाशाचं असतं.
या टॅक्सी चालकांना ३० रुपये द्यायचे आणि आपल्याला हे सेवा पुरवणार नाही, आपल्याशी गैरवर्तन करणार मग कशाला हा आटाटोप पाहिजे. प्रवाशांना स्वस्तात चांगली सुविधा द्या आपोआप प्रवासी तुमच्याकडे फिरवलेली पाठ वळतील. त्याशिवाय बेस्टनंही आता बसचं तिकीट कमी केलं. त्यामुळं त्यांच्याकडं प्रवाशांनी फिरवलेली पाठ वळवली. परंतु, हे टॅक्सी चालक सेवा न पुरवताच भाडेवाढीची मागणी करत आहेत.