महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी)कडून दुष्काळग्रस्त भागात नोकरभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. एकूण १२ जिल्ह्यामध्ये ही नोकरभरती प्रक्रिया राबवण्यात आली. चालक आणि वाहकांच्या एकूण ८ हजार ०२२ पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडली. या पदाच्या भरतीसाठी राज्यभरातून सुमारे ४२ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये महिला उमेद्वारांचे ९३२ अर्ज प्राप्त झाले आहेत. तर महामंडळानं आदिवासी उमेदवारांसाठी राबविलेल्या विशेष प्रचार मोहिमेमुळे अनुसूचित जमातीच्या ६८५ पदांसाठी २ हजार ४०६ अर्ज दाखल झाले आहेत.
चालक तथा वाहक पदाच्या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची १०० गुणांची (५०प्रश्न) लेखी परीक्षा रविवार २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते १२:३० या वेळेत होणार आहे. या परीक्षेकरीता उमेदवारांसाठी आवश्यक असणारे प्रवेश पत्र आणि परिक्षा केंद्राची माहिती एसटी महामंडळाच्या www.msrtc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे. तसंच, याबाबतची सुचना उमेद्वारांना त्यांच्या मोबाईलवर मेसेज व ई-मेल आयडीवर महामंडळातर्फे पाठवण्यात येणार आहे.
चालक तथा वाहक पदाकरीता परीक्षा देणाऱ्या उमेद्वारांना महामंडळाच्या संकेतस्थळावरून प्रवेश पत्राची प्रिंट घ्यावी लागणार आहे. त्यानंतर, प्रवेश पत्र पडताळणीसाठी परीक्षा केंद्रावर किमान दीड तास अगोदर उमेद्वारांना उपस्थित राहावं लागणार असल्याचं, आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आलं आहे.
हेही वाचा