गेल्या काही आठवड्यांपासून दरदिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत अाहे. आज पेट्रोलनं ८५. ३३ रुपयांची उंची गाठली आहे. महाराष्ट्रातील या पेट्रोल दरवाढीचा जोरदार फटका परिवहन आणि भाजीपाला व्यवसायाला बसला अाहे.
मुंबई बाजारपेठेत राज्यभरातून भाजीपाला येतो. भाज्यांसह फळे अाणि कंदफळांचा त्यात समावेश असतो. पण पेट्रोलच्या दरवाढीचा फटका परिवहन विभागाला बसला आहे. त्यामुळे भाजीपाला घेऊन राज्यभरातून मुंबईत येणाऱ्या ट्रकची संख्या हळूहळू घटली अाहे. परिणामी भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे.
असह्य उकाडा आणि वातावरणातील बदलामुळे भाजीपाला निकृष्ठ दर्जाचा होत चालला आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे भाज्यांची अावक कमी प्रमाणात होत असल्यानं भाजी विक्रेत्यावर कमी दर्जाचा भाजीपाला विकण्याची वेळ आली आहे. भाजीपाल्याचा दर्जा घसरला तरी किंमती मात्र वाढल्या अाहेत. पूर्वी फक्त १२ ते १५ रुपयांना विकली जाणारी मेथीची जूडी आज २५ रुपयांना मिळत अाहे तर फ्लॉवरच्या दरानं ५० रुपयांचा पल्ला गाठला आहे.
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराचे पडसाद भविष्यकाळातही भाज्यांच्या दरांवर होणार असण्याची दाट शक्यता आहे. पावसाळा सुरू झाला की भाज्यांची अावक अाणखी कमी होणार असून त्यामुळे भाज्यांचे दर गगनाला भिडण्याची शक्यता अाहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे विक्रीसाठी वाहून नेणाऱ्या मालावरील वाहतूककर वाढतो. पेट्रोल वाढ ही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाही. त्यामुळे भाजीपाला आणि परिवहनाच्या करांमध्ये वाढ होणं सहाजिकच आहे.
- दत्तात्रय देशमुख, एपीएमसी बाजारातील (वाशी) व्यापारी
शेतमालाचं सर्वात जास्त नुकसान उन्हाळ्यात होतं. उन्हाच्या तडाख्यानं भाज्यांमधील पोषकतत्वं नष्ट होतात आणि ती भाजी खाण्यालायक राहत नाही. पेट्रोल दरवाढीमुळं शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत न पोहोचता व्यापाऱ्यांना कमी किंमतीत विकावा लागतो.
- रामकृष्ण धराडे, दादर भाजीमंडईतील भाजीपाला विक्रेते
हेही वाचा -