चहूबाजूंनी निळाभोर समुद्र...खवळणाऱ्या लाटा..सुसाट वारा आणि शांत वातावरणात सफरीला जाण्याची महत्त्वांकाक्षी इच्छा सर्वांचीच असते. समुद्रातच निसर्ग शोधणाऱ्यांना समुद्राच्या शांत, निर्मनुष्य वातावरणात काही क्षण घालवायला कुणाला नाही आवडणार? त्यात जर एका आलिशान क्रूझमधून सफर करण्याची संधी मिळाली तर? क्या बात...तुम्ही म्हणाल क्रूझ वैगरे आमच्यासारख्या सर्वसामान्यांना थोडी परवडणार? हे तर श्रीमंतांचे चोचले. पण नॉट टू वरी. तुम्हाला परवडेल अशीच आहे मुंबई टू गोवा जाणारी ही क्रूझ.
मुंबई ते गोवा आपण विमानानं किंवा एक्स्प्रेसनं नेहमीच जातो. पण एखाद्या आलिशान क्रूझचा आनंद घेण्याची संधी यावेळी मुंबईकरांना देखील मिळाली आहे. मुंबईकरांना जलवाहतुकीचा वेगळा अनुभव मिळावा, यासाठी मुंबई ते गोवा या मार्गावर क्रूज सेवा सुरू करण्यात आली आहे. या क्रूझ सेवेचं उद्घाटन बुधवारी करण्यात आलं.
'अांग्रिया' असं या क्रूझचं नाव आहे. अांग्रिया सी इगल कंपनी आणि मुंबई पोर्ट यांनी सोबत ही क्रूझ सेवा सुरू केली आहे. क्रूझवर जवळपास ८ रेस्टॉरंट्स, बार, कॉफी शॉप, स्विमिंग पूल, मिनी गोल्फ क्लब, क्लब्स असं बरंच काही अनुभवता येणार आहे.
मुंबईहून रोज संध्याकाळी ५ वाजता रवाना झालेली क्रूझ दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता गोव्याला पोहोचणार. क्रूझमध्ये जवळपास ३५० प्रवासी प्रवास करू शकतात. या आलिशान प्रवासासाठी तुम्हाला ७५०० रुपये मोजावे लागतील. यामध्ये ब्रेकफास्ट, मिल आणि रिफ्रेशमेंट देण्यात येईल.
सिद्धार्थ नवलकर
मुंबईत ही क्रूझ भाऊचा धक्का इथं थांबणार आहे. त्यानंतर पुढे ही क्रूझ ६ ठिकाणी थांबा घेणार आहे. दिघी, दाभोळ, रत्नागिरीतला जयगड, विजयदुर्ग, देवगड, पणजी असे थांबे घेत ही क्रूझ गोव्यात दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
कान्होजी आंग्रे नावाचे मराठा सरदार शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख होते. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढण्यात घालवले. त्याकाळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे, किल्ले काबीज करण्याची परकीय सत्तांमध्ये चढाओढ लागली होती. कान्होजींनी या प्रतिकूल परिस्थितीतही कान्होजींनी महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीचं रक्षण करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या नावावरून महाराष्ट्र आणि गोव्याच्या दरम्यान प्रवाळांचं एक मोठं बेट आहे, त्याला आंग्रिया बेट असं नाव पडलं. आणि त्या बेटावरून या क्रूझला 'अांग्रिया' हे नाव देण्यात आलं आहे. ही क्रूझ जपानमधून मागवण्यात आली आहे.
मुंबई-गोवा फेरी बोटसाठी हा पहिलाच प्रयत्न नाही. तर यापूर्वी देखील कोकण किनारपट्टीवर साठ-सत्तरच्या दशकात पणजी ते मुंबई फेरी बोट सेवा चालायची. रस्ते आणि हवाई मार्गाऐवजी जलमार्गाला तेव्हा अधिक प्राधान्य दिलं जायचं. १९८൦ पर्यंत चालणारी ही सेवा नंतर बंद झाली. 'कोकण शक्ती आणि कोकण सेवा'तर्फे ही सेवा पुन्हा सुरु करण्यात आली. त्यानंतर दमानिया शिपिंगनं १९९४ साली मुंबई ते गोवा दरम्यान फेरी बोट सेवा सुरू केली. या बोटीनं मुंबईहून गोव्याला जायला सात तास लागायचे. पण २൦൦४ पासून ही सेवाही बंद करण्यात आली.
हेही वाचा