एसी लोकलचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. ठाणे आणि बदलापूरमध्ये एसी लोकलविरोधात प्रवाश्यांचा उद्रेक पहायला मिळाला. साध्या लोकल रद्द केल्यामुळे गर्दी वाढल्याचा दावा देखील प्रवाशांकडून केला जात आहे. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्र्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील गंभीर इशारा दिला आहे.
“१० एसी ट्रेनमधून ५७०० प्रवासी जातात आणि एका साध्या लोकलमधून २७०० प्रवासी जातात. मग उरलेले प्रवासी कुठल्या ट्रेनमध्ये चढणार? त्याला काहीही पर्याय शोधलेला नाही. लोक लटकून मरत आहेत. लोकांना चढता येत नाहीये. लोकांना प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागत आहे. हे आंदोलन पहिल्यांना कळव्यात झालं. पण आता मुंबईभर पसरू लागलं आहे. कारण जसजशा एसी लोकल वाढत आहेत, तसतसा लोकांना संताप वाढत चालला आहे. कारण लोकांना परवडतच नाहीये”, असं आव्हाड यावेळी म्हणाले.
“आपण सर्वसामान्यांचा विचार करायचा की नाही हा मूळ प्रश्न आहे. रेल्वेला याचा विचार करावा लागेल. कोणतंही आंदोलन जेव्हा विनानेतृत्व सुरू होतं, तेव्हा ते आंदोलन भयानक असतं. कारण तो लोकांच्या मनातला राग असतो. एखाद्या राजकीय पक्षाचं आंदोलन राजकीय हेतू मनात ठेवून होऊ शकतं. पण कोणत्याही राजकीय नेत्याशिवाय, हेतूशिवाय लोक अचानक रेल्वे रुळावर आले, तर रेल्वेनं हा मनातला राग ओळखावा. उगीच बडेजावपणा करू नये”, असा सल्ला आव्हाडांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे.
“मी पूर्वीपासून यासंदर्भात मंत्र्यांशी, अधिकाऱ्यांशी बोलत आहे. ही परिस्थिती सुधरवली नाही, तर मुंबईच्या प्रत्येक स्टेशनवर आग लागेल. मी तर मैदानात आता उतरलो आहे. सर्वसामान्यांकडून मिळत असलेला प्रतिसाद अनपेक्षित आहे. आंदोलनासाठी मध्यमवर्गीय रस्त्यावर येत नाहीत. पण जेव्हा ते रस्त्यावर येताना दिसतात, तेव्हा अस्वस्थता किती मोठ्या प्रमाणावर आहे, हे रेल्वेनं विचारात घेतलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
हेही वाचा