मुंबई दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असून, मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी निर्माण होत आहे. त्यामुळं मुंबईतील या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि वाहतूककोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारनं एक प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार, मुंबईतील वाहतुकीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (आयटीएमएस- इंटिलिजन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम) प्रकल्प राबविण्यास आणि त्यासाठी ८९१ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पाला मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
मुंबईतील सध्यस्थितीत सुमारे ३४ लाख वाहनं आहेत. मुंबई महानगरातील वाहनांची संख्या, वाहतूककोंडी वाहनांच्या रांगा यातून प्रवासासाठी लागणारा वेळ व इंधनावर होणारा खर्च, प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेतून कार्यक्षमतेवर होणारा परिणाम हे पाहता या सर्वांवर उपाय म्हणून अद्ययावत वाहतूक व्यवस्थापनाची गरज आहे.
मुंबईत २ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचं जाळं असून यामधील सुमारे ९५ टक्के रस्त्यांची देखभाल ही महापालिकेकडून करण्यात येते. तसंच, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यावतीनं मुख्यत्वे उड्डाणपूल बांधण्यात येतात. या सर्व रस्ते, उड्डाणपूल यांच्यावरील एकत्रित वाहतूक नियंत्रण आणि नियोजनासाठी इंटिलिजन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम हा प्रकल्प राबवला जाणार आहे. या प्रकल्पासाठी ८९१ कोटी ३४ लाखांचा खर्च होणार आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून रस्त्यांच्या लांबीनुसार वाहनांची संख्या निश्चित करून तसेच रस्त्यावरील वाहतुकीचं प्रमाण लक्षात घेऊन सिग्नल यंत्रणेच्या वेळेमध्ये आवश्यकतेप्रमाणं बदल करणं शक्य होणार आहे. गरजेप्रमाणं सिग्नल यंत्रणेची वेळ प्राधान्यक्रमानुसार बदलता येणार आहे. स्मार्ट सिग्नलिंग, लायसन्स नंबर प्लेट ओळख, अतिवेगवान तसंच, चुकीच्या दिशेनं येणारी वाहनं आणि अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण, चोरीची वाहनं शोधण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा -
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लवकरच मुंबई दौऱ्यावर
गोविंदा पथक साधेपणानं साजरा करणार यंदाचा दहीहंडी उत्सव