दहीहंडी उत्सव आता केवळ २ आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळं मुंबईत राज्यभरातील सर्व गोविंदा पथक थरांच्या सरावात व्यस्त आहेत. प्रत्येक गोविंदा पथकांमध्ये जल्लोषाचं वातावरणं असलं तरी, यंदा दहीहंडी उत्सव साधेपणानं साजरा करण्यात येणार असल्याची भूमिका दहीहंडी समन्वय समितीनं घेतली आहे. राज्यात पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचं आव्हान समोर असल्यानं त्यांच्यासाठी मदतीचा हात देऊन गोविंदा पथकेही दहिहंडी उत्सव साधेपणानं साजरा करणार आहेत.
दहीहंडी समन्वय समितीची मंगळवारी पत्रकार परिषद झाली. त्यावेळी 'अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपलेल्या दहिहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजकांनाही दहिहंडीचं आयोजन रद्द न करता त्यांच्या अतिरिक्त खर्चाला कात्री द्यावी. जेणेकरून, इतक्या वर्षांची परंपरा असलेला हा उत्सव साजरा होईल आणि पूरग्रस्तांनाही मदतीचा हात मिळेल़', असं समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांनी म्हटलं.
मागील वर्षी गोविदा पथकांच्या सुरक्षेसाठी विमा काढण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, ५७० गोविंदा पथकांनी विमा काढल्याची माहिती समोर येत आहे. तसंच, वैयक्तिक पातळीवर १६८ गोविंदा पथकांनी विमा काढल्याची माहिती मिळते. सिताबेन शहा मेमोरिअल ट्रस्टच्या माध्यमातून ६६, साई सेवा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून ७०, मोहित भारतीय फाउंडेशननं १६ आणि श्री मुलुंड युवक प्रेरणा संस्थेच्या माध्यमातून ७ गोविंदा पथकांचा विमा काढण्यात आला़ आहे.
गोविंदा पथकांसह आयोजकांनीही विमा काढणं बंधनकारक आहे. त्यानुसार, 'स्वामी प्रतिष्ठान' या आयोजकांनी २०० गोविंदा पथकांचा विमा काढला आहे.
तसंच, एका खासगी एनजी ड्रिंक कंपनीनं ४३ गोविंदा पथकांचा विमा काढला आहे.
या दोन्ही आयोजनाच्या माध्यमातून १२ हजार १५० खेळाडूंना विम्याचं कवच मिळणार आहे.
हेही वाचा -
बेस्टच्या संपाबाबत २३ ऑगस्टला मतदान