रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी दर रविवारी मेगाब्लॉक घेतला जातो. हे साहजिकच आपल्याला माहीत असेल. पण मध्य रेल्वे मार्गावर इतका कचरा साचला आहे, की तो उचलण्यासाठी रेल्वे प्रशासनावर चक्क मेगाब्लॉक घेण्याची वेळ आली आहे.
मध्य रेल्वेवर साचलेला कचरा उचलण्याचं काम नेहमीच सुरू असतं. पण सध्या येथे ३० मजली उंच इमारतीएवढा कचरा साचला आहे. त्यामुळे हा कचरा उचलण्यासाठी बुधवारी मध्य रेल्वेवर ब्लॉक घेण्यात आला.
मध्य रेल्वेच्या रुळांवर नेहमीच कचरा साचतो. या कचऱ्यामुळेच बुधवारी मालगाडीचा डबा घसरला का? याचा तपास रेल्वेकडून केला जात आहे. कचरा उचलण्यासाठी मध्य रेल्वेकडून दररोज चार विशेष गाड्या चालवल्या जातात. या कचऱ्याचा वापर मानखुर्द-वाशी आणि दिवा या स्थानकावर रुळांच्या भरणीसाठी केला जातो.
रेल्वेतून रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. याच रेल्वे रुळाच्या शेजारी वसाहती देखील आहेत. पावसाळ्यात या कचऱ्यामुळेच रेल्वेचा खोळंबा होतो आणि याचा फटका प्रवाशांना बसतो. पण इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा साचण्यासाठी नेमके जबाबदार कोण? प्रवासी की वसाहतीत राहणारे लोक? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.