मोनोरेल आगीप्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाचे निवृत्त आयुक्त पी. एस. बाघेल यांच्या समितीने नुकताच यासंबंधीचा अंतरिम अहवाल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)ला सादर केला आहे. टायर गरम झाल्याने मोनोला आग लागली आणि आग विझवण्यासाठीची आपत्कालीन यंत्रणा ऐनवेळी कुचकामी ठरल्याने आग भडकल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
चेंबूर स्थानकातून वडाळ्याच्या दिशेने निघालेल्या मोनोरेलला म्हैसूर काॅलनी स्थानकात ९ नोव्हेंबरला पहाटे ५ वाजून १९ मिनिटांनी आग लागली होती. या आगीत मोनोचे दोन डबे जळून खाक झाले. तर स्थानकाचंही मोठं नुकसान झालं. अग्निशमन दलाच्या तासाभराच्या प्रयत्नानंतर ही आग विझली. या आगीमुळे ३ वर्षांपासून अवरित सुरू असलेली मोनोची सेवा तब्बल १३ दिवसांनंतरही बंद आहे.
या आगीमुळे मोनोरेलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने 'एमएमआरडीए'चे महानगर आयुक्त युपीएस मदान यांनी मोनोरेलची संपूर्ण चाचणी झाल्याशिवाय मोनो सेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे अजूनही मोनोच्या चाचण्या आणि चौकशी सुरू आहे. तर पुढील आठवभरा तरी मोनोरेल सेवा बंदच राहण्याची शक्यता आहे.
आगीच्या अंतरिम चौकशी अहवालानुसार मोनोरेलला आग लागण्याआधी ती रात्रभर फेऱ्या मारत होती. या फेऱ्या मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्यातील 'ट्रायल रन'साठी होत्या. रात्रभर मोनोच्या फेऱ्या सुरू असल्याने मोनोचे टायर गरम झाले आणि स्पार्क होऊन त्यातून अचानक धूर येऊ लागला. धूर नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न झाले. पण त्यासाठी आवश्यक आपत्कालीन यंत्रणाच कार्यान्वित न झाल्याने आग भडकली, असा प्राथमिक निष्कर्षही समितीने काढला आहे.
एकूणच तांत्रिक चुका आणि मोनोच्या देखभालीकडे झालेलं दुर्लक्ष यामुळे आग लागल्याचं अंतरिम अहवालातून समोर येत आहे. त्यामुळे आता अंतिम अहवाल काय येतो आणि त्यात कुणाला जबाबदार धरलं जातं? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सोबतच या पुढे अशा घटना घडू नये यासाठी 'एमएमआरडीए' काय ठोस उपाययोजना करते हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा-