पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरस्थितीचा एसटी महामंडळाला मोठ्या फटका बसला होता. पूराचं पाणी रस्त्यावर आल्यानं अनेक भागातील एसटी सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळं प्रवासी संख्या कमी होऊन ५० कोटींपेक्षा जास्त रुपयांचा तोटा महामंडळाला सहन करावा लागला होता. परंतु, रक्षाबंधन आणि सलग सुट्ट्यांमुळं अवघ्या ४ दिवसांत एसटी महामंडळाला प्रवासी वाहतूकीतून १०० कोटींचं उत्पन्न मिळालं आहे. त्यामुळं एसटीच्या उत्पनात वाढ झाल्याचं समजतं.
रक्षाबंधन सणासाठी एसटी महामंडळानं आगारनिहाय स्थानिक पातळीवर सुमारे २ हजार जादा बसेसच्या वाहतुकीचं नियोजन केलं होतं. प्रत्येक विभागात विभाग नियंत्रकाच्या मार्गदर्शनाखाली १५ ते १८ ऑगस्ट या काळात जादा बसगाड्या सोडल्या होत्या.
रक्षाबंधन व त्यानंतर आलेल्या सलग सुट्ट्यांमुळं एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ होऊन दैनंदिन उत्पन्न २५ कोटींपर्यंत पोहोचलं होतं. त्यामुळं रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर एसटी महामंडळानं अवघ्या ४ दिवसांत १०० कोटींचा आकडा पार केला.
हेही वाचा -
तेजुकायाची कागदी लगद्याची गणेशमूर्ती, वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार नोंद
स्मार्ट कार्ड योजनेमुळं एसटीच्या ज्येष्ठ प्रवाशांचं हाल