मुंबईत गेले ३ दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. अनेक नागरिक नोकरी-धंद्यासाठी सकाळी घराबाहेर पडले होते. पण पावसामुळे अनेक जण रस्त्यातच अडकले. रेल्वे सेवा आणि सार्वजनिक वाहतुक सेवेवर देखील पावसाचा परिणाम झाला. त्यामुळे अनेक नागरिक अडकले. पण अशांसाठी महापालिका पुढे सरसावली.
पालिकेनं जाहीर केलं की, बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे लोकल सेवा आणि वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशनवर किंवा अन्य ठिकाणी अडकलेल्या नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात थांबण्याची व्यवस्था रेल्वे स्टेशन नजीकच्या मनपा शाळांमध्ये करण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबईतील मुसळधार पावसामुळे घराबाहेर न पडण्याचं मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी आवाहन केलं आहे. आपातकालीन परिस्थितीमध्ये मुंबई पेलिसांशी १०० या क्रमांकावर अथवा ट्विटरवर संपर्क साधवा, असंही पोलिस आयुक्तांनी म्हटलं आहे.
कोलाबा वेधशाळेनं दिलेली माहिती अशी की, गेल्या ९ तासांत २२९.६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र पूरपरिस्थितीचा आढावा घेत आहेत.
हेही वाचा