सहा महिन्यापूर्वी सुरू झालेली नवी मुंबई-अलिबाग स्पीडबोट सेवा बंद करण्यात आली आहे. नवी मुंबईहून समुद्रामार्गे मुंबईत आणि अलिबाग येथे जाता यावे यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून स्पीडबोट सेवा सुरू करण्यात आली होती.
आठवड्यातून दोन दिवस शनिवार आणि रविवार, ही बोट सेवा सुरू होती. या बोटीला लोकांचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता. मात्र आता ही बोट बंद असल्याने अनेक नागरिकांना प्रवासासाठी इतर पर्यायांचा वापर करावा लागत आहे. ज्यामुळे त्यांना अधिक पैसे देखील खर्च करावे लागत आहे.
अलिबाग आणि मांडावा येथे देश आणि महाराष्ट्रभरातून अनेक लोक पर्यटनासाठी येत असतात. यातच सध्या शाळकरी मुलांना उन्हाळ्याची सुट्टी आहे. पालकवर्ग मोठ्या प्रमाणात अलिबाग आणि मांडावा या ठिकाणी पर्यटनासाठी जात होते.
मात्र सध्या ही बोट गेल्या आठवड्याभरापासून बंद असल्याने पर्यटकांचीही मोठी गैरसोय होत आहे. अजूनही महिनाभर ही बोट सुरू होण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मे महिन्यापर्यंत अलिबागला जाण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही सेवा बंद राहणार आहे. या बोटीत काही तांत्रिक बिघाड आल्याने, ही बोट सेवा बंद ठेवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, या ठिकाणाहून गेट वे ऑफ इंडिया येथे जाणारी बोट सेवा देखील बंद आहे. कारण याच्या एका फेरीला प्रवाशांना 300 रुपयांचं तिकीट काढावं लागत होतं. यातच नवी मुंबई येथील नागरिक 300 रुपये खर्च करून या सेवेचा लाभ घेत नसल्याने ही बोट देखील अनेकदा बंद ठेवण्यात येते. या बोटीच्या तिकिटाचे दर कमी करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा