नवी मुंबईत शहरात वाढती लोकवस्ती आणि गाड्यांच्या वाढत्या संख्येमुळे सद्यस्थितीत सायन-पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. ही वाहतूककोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने तुर्भे ते खारघर दरम्यान ६ किमी लांबीचा बोगदा तयार करण्याची योजना आखली आहे. नव्याने होणाऱ्या या ८ पदरी बोगद्यामुळे प्रवाशांचे २ तास वाचणार आहेत.
मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी शीव-पनवेल महामार्गाचा बहुतांश प्रवासी वापर करतात. तर दुसरीकडे ठाण्याहून बेलापूरला येणाऱ्या अवजड वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नवी मुंबई परिसरात दुपारी आणि सायंकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. पावसाळ्यात तर रस्त्यांच्या दुर्दशेमुळे कित्येक तास वाया जागेवरच खोळंबून राहावं लागतं.
वाहनांच्या लांबच लांब लागणाऱ्या रांगामुळे मुंबईहून पुणे, कोकण, गोवा या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला मोठा फटका बसतो. त्यामुळे नुकत्याच झालेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पर्यायी उपाययोजना करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला सुचवलं होतं.
त्यानुसार तुर्भे-खारघर दरम्यान पारसिक डोंगरातून ८ पदरी बोगदा बांधल्यास हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. हे लक्षात आल्यानंतर या आठपदरी बोगद्यांच्या बांधकामाबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. सुमारे ६ किलोमीटर लांबीच्या आठपदरी बोगद्यामुळे वाहनांना सानपाडा, नेरुळ, बेलापूर या भागाला वळसा न घातला थेट जाता येईल. त्यामुळे अंतर आणि वेळेची बचत होणार आहे.
या बोगद्याची जबाबदारी सरकारने राज्य रस्ते विकास महामंडळावर सोपविली असून त्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि वित्तीय मदत करण्याची जबाबदारी सिडको आणि औद्योगिक विकास महामंडळावर सोपवली आहे. तर या प्रकल्पासाठी स्तूप कन्सल्टंट यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्पाच्या तांत्रिक आणि वित्तीय सुसाध्यता अहवाल आल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल.
हेही वाचा-
इंडिगोच्या विमानात बाॅम्ब ठेवल्याची अफवा, २ तास उशीराने विमान दिल्लीकडे झेपावलं
'एमएमआरडीए'ने घेतला मोनोरेलचा ताबा, स्कोमी, एल अँड टीची हाकालपट्टी