मुंबई-दिल्ली मार्गावर धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षात प्रवाशांना राजधानी एक्स्प्रेसनं अधिक जलद प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. पश्चिम रेल्वेनं सर्व राजधानी एक्स्प्रेस गाड्या पुश-पुल तंत्रज्ञानावर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या तंत्रज्ञानानं धावत असलेल्या राजधानी एक्स्प्रेसची चाचणी यशस्वी झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळं नव्या वर्षात 'मुंबई-दिल्ली' रेल्वे या प्रवासात १ तास वाचण्याची शक्यता आहे.
'मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली राजधानी' आणि 'ऑगस्ट क्रांती राजधानी' या एक्स्प्रेस सेवांसाठी पश्चिम रेल्वेकडे एकूण ५ गाड्या आहेत. यापैकी १ गाडी सध्या प्रायोगिक तत्त्वावर पुश-पुल तंत्रज्ञानानुसार धावत आहे. उर्वरित ४ गाड्यांमध्ये पुश-पुल तंत्रज्ञान आणण्यासाठी आवश्यक विद्युत जोडणीचं काम सध्या सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर पुश-पुल पद्धतीनं राजधानी मार्गस्थ होणार असल्याची माहिती मिळते.
'मेल-एक्स्प्रेसचा वेग वाढवण्यासाठी पुश-पुल तंत्रज्ञान वापर करण्याच्या सूचना रेल्वे मंत्रालयाने दिल्या आहेत. त्यानुसार, पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस ऑगस्ट महिन्यापासून पुश-पुल तंत्रज्ञानावर धावत आहे. ही चाचणी यशस्वी ठरली असून, चाचणीत मुंबई-दिल्ली हे अंतर निर्धारित वेळेच्या ६० मिनिटं आधी पूर्ण करण्यात आल्यानं दोन्ही राजधानी एक्स्प्रेस या तंत्रज्ञानावर चालवण्यात येणार आहेत.
डिसेंबरअखेर सर्व राजधानी गाड्यांतील पुश-पुल तंत्रज्ञानाचं काम पूर्ण होणार आहे. 'पुश-पुल चाचणीमुळं राजधानीचा वेग वाढल्यानं या एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नवे वेळापत्रक निश्चित झाल्यावर त्याची माहिती प्रवाशांना देण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.
हेही वाचा -
महापालिकेचे दवाखाने राहणार रात्री ११ वाजेपर्यंत खुले
मुंबईतील १० टक्के पाणीकपात आठवडाभर पुढे