Advertisement

शिवनेरी, शिवशाही, बससेवाकडून सर्वाधिक नियमांचे उल्लंघन

अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी आता कडक पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. महामार्गांवरील वेग मर्यादा ओलांडल्यास आता थेट वाहनचालकाचा परवानाच रद्द करण्यात येणार आहे.

शिवनेरी, शिवशाही, बससेवाकडून सर्वाधिक नियमांचे उल्लंघन
SHARES

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाढलेले अपघात लक्षात घेता, हे अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी आता कडक पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. महामार्गांवरील वेग मर्यादा ओलांडल्यास आता थेट वाहनचालकाचा परवानाच रद्द करण्यात येणार आहे. तर खासगी बस आणि एसटी चालकांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील केली जाणार आहे.महामार्ग पोलिसांनी आतापर्यंत ३४२ बसेसवर कारवाई करण्यात आली असून त्यामध्ये शिवशाही, शिवनेरी,विठाई, हिरकणी या शासकिय बससेवाचे प्रमाण सर्वाधिक आहे. या कारवाईनंतर निलंबनाचा प्रस्तावच महामार्ग पोलिसांकडून आरटीओला पाठवला जाणार असल्याचे सांगितले. ही मोहीम १५ दिवसांसाठी असेल.


हेही वाचाः- राज्यात पोलिसांची ‘घर घर’ संपणार! पोलिसांना मिळणार १० हजार घरं


वेगमर्यादा ओलांडणारी वाहने ही महामार्ग पोलिसांची मोठी डोकेदुखी ठरत होती. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना चाप लावण्यासाठी महामार्ग पोलिसांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी पळस्पे येथे कॅमेरे बसवण्यात आले, वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांना एक हजार रुपये दंड आकारला गेला. मात्र तरीही बेशिस्त वाहनचालकांची मुजोरी ही कायमच सुरू होती. एक्स्प्रेसवेवर ताशी ८० किमी वेगमर्यादा आहे. मात्र क्वचितच एखादे वाहन वेगमर्यादा पाळताना दिसते. बहुसंख्य वाहने ८० किमीपेक्षा जास्त वेगाने जातात. काही वाहने तर ताशी १२० किमीचा वेगाने धावतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. एक्स्प्रेसवेवरील सर्वाधिक अपघातांचे कारण वेगमर्यादा ओलांडणे व मार्गिका बदलणे हेच आहे. वेगवान वाहनांना ब्रेक लावण्यासाठी महामार्ग पोलिस विविध प्रकारे प्रयत्न करत असतात. त्यासाठी मध्यंतरी स्पीडगनही बसवण्यात आल्या होत्या. मात्र स्पीडगन हाताळण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता, स्पीडगनची अपुरी संख्या, चार्जिंग होण्यासाठी लागणारा वेळ आदी कारणांमुळे त्यांचा प्रभावी वापर झाला नाही.दोन टोलनाक्यांमध्ये वाहने किती गतीने धावतात, याची तपासणी करण्याचा प्रयोगही करण्यात आला. वाहन जेव्हा खालापूर टोलनाक्यावर येते, तेव्हा टोलच्या पावतीवर ते वाहन किती वाजता आले याची नोंद होते. त्यानंतर ८० किमीच्या निर्धारित वेळेनुसार तेच वाहन पुढील कुसगाव टोलनाक्यावर विशिष्ट कालावधीत पोहोचणे आवश्यक असते. परंतु या दोन टोलनाक्यांच्या दरम्यानच्या प्रवासात बहुसंख्य वाहने ८० किमीच्या वेगाने जातात व निर्धारित वेळेच्या आधीच कुसगाव टोलनाक्यावर पोहोचतात. याचा अर्थ त्या वाहनाने मधल्या प्रवासात वेगमर्यादा ओलांडली, हे स्पष्ट होऊनही कारवाई मात्र होत नव्हती. उपाययोजना राबवण्यात अनेक अडचणी असूनही महामार्ग पोलिसांनी चिकाटी सोडलेली नाही. 


हेही वाचाः- मुंबईतील धरण, तलाव होणार पर्यटनस्थळ


मुंबई ते पुणे एक्स्प्रेस वे वर प्रवासी बससाठी प्रतितास ८० किलोमीटरची, तर छोटय़ा वाहनांना प्रतितास १०० किलोमीटरची वेगमर्यादा आखून दिली आहे. मात्र ही वेगमर्यादा खासगी प्रवासी बसबरोबरच एसटीचे चालकही ओलांडतात. एसटी बस प्रतितास ८० किमी वेगावर स्पीड लॉक असतो. मात्र त्याच्याशी काहीजणांकडून छेडछाड केली जाते. जानेवारी महिन्यात वेगमर्यादा ओलांडलेल्या एसटीच्या चार बस पकडण्यात आल्या होत्या. यामध्ये वातानुकूलित बसही होत्या. त्यांनी ताशी ८० ची वेगमर्यादा ओलांडल्याचे आढळले होते. खासगी बस तर ताशी १०० पेक्षाही अधिक वेगाने धावत असल्याचे नियमित कारवाईत निदर्शनास आले आहे. त्यांच्यावर परवाना व लायसन्स निलंबन कारवाईऐवजी एक हजार ते १,२०० रुपये दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र ही कारवाई होऊनही पुन्हा जैसे थेच परिस्थिती निर्माण होते, तर वेगमर्यादा ओलांडणाऱ्या बेदरकार वाहनांमुळे अपघात होतात. याला आळा घालण्यासाठी येत्या दोन दिवसांत खासगी व एसटी बसविरोधात महामार्ग पोलिसांकडून विशेष मोहीम घेतली जाणार असल्याची माहिती महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्रचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान यांनी दिली. या मोहिमेत खासगी प्रवासी बस आणि एसटी गाडय़ांनी वेगाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास दंडात्मक कारवाई होईलच. शिवाय वाहनचालकाचा परवाना आणि त्याचे लायसन्स (अनुज्ञप्ती) निलंबित करण्यासाठी आरटीओकडे प्रस्तावही पाठवणार असल्याचे प्रधान म्हणाले. यात एसटीविरोधात कारवाई करताना एसटी अधिकाऱ्यांनाही सामील करून घेतले जाणार आहे.
 
शिवनेरी, शिवशाही,बससेवाकडून सर्वाधिक नियमांचे उल्लंघन
 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर ट्रक चालक खासगी बसचालक लेनची शिस्त पाळत नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर लेनच्या शिस्तीबाबत अनेक उपाय योजना करून ही परिस्थिती जैसे थेच होती. एक्सप्रेस वे वरून प्रवास करताना आतापर्यंत ३४२ एसटी बस चालकांकडून मार्गिकांचे सर्रास उल्लंघन केले गेले आहे. अवजड व प्रवासी वाहनांना मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गिकेच्या डाव्या बाजूने, तर हलक्या वाहनांना मधल्या मार्गिकेवरून जाणे बंधनकारक आहे. मात्र उल्लंघन केल्याने अपघाताचा धोका संभवतो. गेल्या महिन्यात खालापूर ते कळंबोली पट्टय़ात याचे उल्लंघन करणाऱ्या ३४२ एसटी पकडण्यात आल्याची माहिती महामार्ग पोलीस केंद्र, पळस्पे-नवी मुंबईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सांगितले. 


अशा प्रकारे होणार कारवाई

* नुकताच नाशिकमधील देवळा येथे एसटी आणि रिक्षाची धडक होऊन झालेल्या अपघातांत अनेकांचा जीव गेला. यामध्ये एसटी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या अपघाताची दखल महामार्ग पोलिसांनी मुंबई ते पुणे एक्स्प्रेस वे वर वेग मर्यादेचे उल्लंघन करण्यांविरोधात विशेष मोहीम घेण्याचा निर्णय घेतला आहे.


* मुंबई ते पुणे एक्स्प्रेस वे वर चार इंटरसेप्टर वाहने असून यामध्ये स्पीड गन्स, ब्रेथ अ‍ॅनलायझर आहेत. या स्पीड गन्समार्फत विशेष मोहिमेत कारवाई केली जाणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा