विना तिकीट प्रवास करणाऱ्या तसंच आरक्षित न केलेलं सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेने जून महिन्यांत ११ कोटी १६ लाख रुपयांचा दंड वसूल केला. पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई, भावनगर, राजकोट, अहमदाबाद, वडोदरा, रतलाम या ६ विभागांत रेल्वे अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
पश्चिम रेल्वे मार्गावर अशी कारवाई नियमीतपणे केली जाते. त्यानुसार अधिकाऱ्यांनी एकूण २ लाख ३२ हजार प्रकरणे दाखल केली. त्यातून दंड स्वरूपात जमा केलेले ११ कोटी १६ लाख रुपये पश्चिम रेल्वेचे तिजोरीत जमा झाले.
या कारवाई अंतर्गत पश्चिम रेल्वेने दलालांविरोधात कारवाई करण्यासाठी २२० तपासण्या केल्या. त्यात १८७ प्रवाशांना २७ आरक्षित तिकीटं हस्तांतरीत करताना पकडलं. त्यांच्याकडून ३० हजार ९५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सोबत रेल्वे स्थानक परिसरातील ६०७ फेरीवाले आणि २०९ गर्दुल्ल्यांवर कारवाई करत त्यांना रेल्वे स्थानक परिसरातून बाहेर करण्यात आलं. यापैकी दंड न भरणाऱ्या १५३ जणांना तुरूंगात टाकण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.
हेही वाचा-
गैरसोईंच्या गर्तेत मोनो रेल्वे!
गणपती उत्सवासाठी एसटी सज्ज २२०० जादा बसेस सोडणार