पश्चिम रेल्वेवर दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. त्यातच स्वत: चं आरक्षित तिकीट दुसऱ्याला देणं, विना तिकीट प्रवास करणं अशा घटनांची संख्याही वाढली आहे. अशा फुकट्या प्रवाशांविरुद्ध पश्चिम रेल्वेने ऑक्टोबर महिन्यात केलेल्या कारवाईत फुकट्या प्रवाशांकडून १२ कोटी ३५ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर, २ लाख ६४ हजार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत आॅक्टोबरमधील दंडवसुलीत १२.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसंच, या महिन्यात ८२५ भिकारी आणि अनधिकृत फेरीवाल्यांना रेल्वे परिसरातून बाहेर काढण्यात आलं असून १५३ जणांना तुरुंगात पाठवण्यात आलं आहे.
पश्चिम रेल्वे प्रशासनाने ऑक्टोबर महिन्यात तिकीट दलाल आणि इतर संशयीत प्रवाशांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत १५१ जणांना पकडण्यात आलं असून रेल्वेच्या नियमानुसार त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले आहेत.
तसेच १२ वर्षांवरील ४५ विद्यार्थ्यांना महिलांच्या डब्यातून प्रवास करताना पकडण्यात आलं आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मोहीम यापुढंही सुरूच ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे, प्रवाशांनी विना तिकीट प्रवास करू नये, असं आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केलं आहे.