आझाद मैदान- पालिकेच्या नायर रूग्णालयात संशयास्पदरित्या मुत्यू पावलेल्या कमला कल्याणी नावाच्या महिलेच्या मृत्यू प्रकरणाची आग्रीपाडा पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी वरळी येथील समाजसेवक आणि शिवसेना शाखा क्र. 192 चे कार्यकर्ते वेणुगोपाल हनुमंतू कुसुमा यांनी केली आहे. याबाबत माहिती देताना कुसुमा यांनी सांगितले की, कमला कल्याणी नावाच्या महिलेला मूळव्याधाचा त्रास होता. यामुळे तिला 30 ऑगस्ट रोजी पालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. रूग्णालयात उपचार सुरू असताना 1 सप्टेंबर रोजी दुपारी 12.20 वाजताच्या सूमारास तिचा संशयास्पद मुत्यू झाला. या महिलेचा असा अचानकपणे कसा काय मुत्यू झाला? या महिलेच्या मुत्यूला ड्युटीवर असलेले डॉक्टर जबाबदार आहेत. त्यामुळे या प्रकरणाची आग्रीपाडा पोलिसांनी कसून चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी. याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पोलीस आयुक्तांकडेही दिले आहे. या मागणीसाठी वेणुगोपाल कुसुमा यांनी गेल्या आठवड्यात आझाद मैदानात एक दिवसीय उपोषण देखील केले होते.