अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कोकणातील 50 हजार पेट्या हापूस आंबा नवी मुंबईतील वाशीच्या एपीएमसीमध्ये दाखल झाला आहे. हा हापूस नवी मुंबई, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण-डोंबिवली आदी भागात विक्रीसाठी जात असल्याने लॉकडाऊनच्या काळातही हापूस आंब्याची चव चाखायला मिळणार आहे.
एपीएमसीमध्ये आलेला हाबूस आंबा रायगड, रत्नागिरी, सिंधूदूर्गमधील आहे. हापूस आंबा एेन भरात आला असतानाच कोरोनामुळे एपीएमसीमधील फळ मार्केट बंद करण्याचा निर्णय व्यापारी वर्गाने घेतला होता. त्यामुळे हापूस विकायचा कसा या चिंतेत शेतकरी सापडला होता. मात्र सरकारने कमी गाड्यांची अट, मास्क, सॅनिटाझर टनल अशी नियमावली लागू करत फळ मार्केट सुरू केले. यामुळे हापूस आंब्याची आवक वाढली. हवामानातील बदल, आवकाळी पाऊस यामुळे कोकणात यावर्षी हापूस आंबा पिक मोठ्या प्रमाणात आलेले नाही. त्यामुळे मार्च महिन्याच्या तोंडावर मोठी आवक होणारा हापूस आंबा एप्रिल संपत आला तरी पाहिजे तसा मार्केटमध्ये दाखल होताना दिसत नाही.
हापूसची आवक घटली असली तरी डझनाला 300 ते 500 रूपये भाव सुरू आहे. त्यातच आता रमजान सुरू झाला असल्याचा फायदा हापूसला मिळत आहे. दुसरीकडे सरकारने निर्यात सुरू केली असल्यामुळे परदेशात हापूसची निर्यात होताना दिसत आहे. युरोप आणि अमेरिकेमध्ये कोरोनामुळे हापूस आंब्याची निर्यात अजून सुरू झालेली नाही.
हेही वाचा -