एटीएम (ATM)मधून पैसे काढताना काही वेळेला पैसे बाहेर येत नाहीत. मात्र तुमच्या खात्यातून पैसे डेबिट झाल्याचा मेसेज येतो. तर अनेकदा तुम्ही आॅनलाईन पैसे पाठवता, मात्र समोरच्याच्या खात्यात ते जमा होत नाहीत. मग ते पैसे परत मिळवण्यासाठी बँकेच्या चकरा माराव्या लागतात. मात्र, आता तुम्हाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही. कारण एटीएम आणि आॅनलाईन पैसे पाठवण्याचे व्यवहार फेल गेल्यास निश्चित कालावधीत बँकेला तुमचे पैसे परत करावे लागणार आहेत. मात्र, बँकेने असं न केल्यास बँकेकडून ग्राहकांना नुकसान भरपाई मिळणार आहे. व्यवहार फेल होण्याबाबत रिझर्व्ह बँकेने नवीन नियम निश्चित केले आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमानुसार, जर एटीएममधून पैसे काढताना पैसे न मिळता खात्यातून पैसे कमी झाल्यास बँकेला ५ दिवसात ग्राहकाला पैसे परत करावे लागणार आहेत. जर बँकेने ५ दिवसात पैसे दिले नाहीत तर त्यानंतर प्रत्येक दिवसाला ग्राहकाला १०० रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे.
या व्यवहारात खात्यातून पैसे कापले गेल्यास आणि रिसिव्हरच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर एका दिवसात पैसे परत करावे लागणार आहेत. पैसे परत न आल्यास दुसऱ्या दिवसापासून ग्राहकाला १०० रुपये नुकसान भरपाई मिळेल.
या व्यवहारात जर एका कार्डमधील पैसे कमी झाल्यास आणि दुसऱ्या कार्डमध्ये पैसे ट्रान्सफर न झाल्यास एका दिवसात पैसे परत करणं बँकांना बंधनकारक आहे. दुसऱ्या दिवसापासून १०० रुपये नुकसान भरपाई ग्राहकांना मिळणार आहेत.
UPI वरून पैसे पाठवताना व्यवहार फेल झाल्यास आणि तुमच्या खात्यातून पैसे कमी झाल्यास एका दिवसात तुम्हाला आता पैसे परत मिळतील. जर असे न झाल्यास दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला बँकेकडून रोज १०० रुपये मिळतील. जर UPI वरून मर्चंट पेमेंटवर पैसे पाठवताना तुमच्या खात्यातून पैसे कमी झाले आणि मर्चंटपर्यंत पैसे न पोचल्यास ५ दिवसात पैसे परत मिळतील. त्यानंतर प्रत्येक दिवसासाठी तुम्हाला १०० रुपये नुकसान भरपाई मिळेल.
खात्यातून पैसे कापले गेल्यास आणि मर्चंटला पैसे न मिळाल्यास ५ दिवसात कापलेले पैसे परत करावे लागणार आहेत. त्यानंतर सहाव्या दिवसापासून रोज ग्राहकाला १०० रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे.
हेही वाचा -
Credit Card वापरताना 'ह्या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पडेल मोठा भुर्दंड
'ह्या' बँकांचं Car Loan आहे स्वस्त, खिशावर नाही पडणार अधिक ईएमआय