मागील काही वर्षांपासून तोट्यात असणाऱ्या सीकेपी सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे बँकेतील 11 हजार 500 ठेवीदार आणि 1.20 लाख खातेदारांना मोठा धक्का बसला आहे. बँकेतील 485 कोटींच्या ठेवी संकटात आल्याने ठेवीदारांना मोठा धक्का बसला आहे. रिझर्व्ह बँकेकडून गुरुवारी रात्री सीकेपी बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दादरमध्ये मुख्यालय असलेल्या सीकेपी बँकेचा तोटा वाढल्याने व नेट वर्थमध्ये मोठी घट झाल्याने बँकेच्या व्यवहारांवर २०१४ मध्ये निर्बंध आणले गेले. त्यानंतर अनेकदा या बँकेचा तोटा कमी करण्याचा प्रयत्न झाला. ठेवीदारांकडून बँकेचा तोटा करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येत होती. त्याचे निकाल काही प्रमाणात दिसू लागले होते. तोटा कमी होत होता. पण त्याचवेळी रिझर्व्ह बँकेने सीकेपी बँकेचा परवानाच रद्द करीत ठेवीदारांना मोठा धक्का दिला.
रिझर्व्ह बँक 2014 पासून सातत्याने बँकेवरील निर्बंधांना मुदतवाढ देत आहे. अलिकडील मुदतवाढ 31 मार्चला देण्यात आली. ती 31 मे रोजी संपणार होती. त्याआधीच रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केला. बँकेवर सध्या सहकार विभागाच्या प्रशासकांचं नियंत्रण आहे. २०१६ मध्ये बँकेचे नेट वर्थ उणे १४६ कोटी रुपये होते. ते आता उणे २३० कोटी रुपयांवर आले आहे. परिचालनात्मक नफा असला तरी नेट वर्थमध्ये घट होत असल्यानेच परवाना रद्द झाल्याचं सांगितलं जात आहे.
हेही वाचा -