पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (PMC) बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)ने पुढील ६ महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. या निर्बंधामुळे बँकेच्या खातेधारकांना आपल्या कुठल्याही खात्यातून केवळ १ हजार रुपये इतकीच रक्कम काढता येणार आहे. शिवाय ‘पीएमसी’ बँकेला नवी कर्ज देणं, ठेवी स्वीकारण्यावरही निर्बंध असतील.
हे निर्बंध ६ महिन्यासाठी लागू असतील व त्याचा पुन्हा आढावा घेतला जाईल. या निर्बंधांची माहिती बँकेने प्रत्येक ठेवीदाराला देणं बंधनकारक आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक डॉ. रबी मिश्रा यांनी दिली आहे.
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, रिझर्व्ह बँकेने बँकिंग परवाना रद्द केला नसला, तरी पुढील सूचना येईपर्यंत ‘पीएमसी’ बँकेला आर्थिक निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय सुरू ठेवता येईल. रिझर्व्ह बँक परिस्थितीनुसार या दिशानिर्देशांमध्ये बदल करण्याबाबत विचार करू शकते.
आरबीआयने लागू केलेले हे निर्बंध बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९, सेक्शन ५६ च्या कलम ३५ अ, पोट-कलम (१) अंतर्गत लागू करण्यात आले आहेत. बँकेची सद्यस्थिती पाहता ग्राहकांच्या हितासाठी बँकेवर निर्बंध आणणं गरजेचं होतं, असं आरबीआयने स्पष्ट केलं आहे.
निर्बंधाच्या काळात बँकेच्या ठेवीदारांना आपल्या सर्व प्रकारच्या खात्यांमधून फक्त १ हजार रुपयेच काढता येतील. परंतु ठेवीदार बँकेचा कुठल्याही प्रकारचा देणेकरी असल्यास किंवा कर्जाचा हमीदार असल्यास ही रक्कम त्याच्या कर्ज खात्यात जमा करता येईल. ठेवीदारांच्या ठेवीची मुदत संपत असल्यास ही ठेव त्याच व्यक्तीच्या नावाने व त्याच व्याजदराने पुन्हा गुंतवता येईल.
मार्चअखेरपर्यंत पीएमसी बँकेकडे ११,६१७ कोटी रुपयांच्या ठेवी आणि ८,३८३ कोटी रुपयांची अॅडव्हांस रक्कम जमा होती. पीएमसी या मल्टीस्टेट को-आॅप सहकारी बँकेच्या महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये १३७ शाखा आहेत.
हेही वाचा-
काॅर्पोरेट करात कपात, केंद्र सरकारची महत्त्वाची घोषणा
२६ सप्टेंबरपासून आठवडाभर बँका बंद