माझे पैसे परत घेऊन सरकारी बँकांनी डबघाईला आलेल्या जेट एअरवेजला वाचवावं असं आवाहन बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून परदेशात पळालेल्या उद्योगपती विजय माल्यानं केलं आहे. सरकारी बँका आणि दुसऱ्या कर्जदारांचे पैसे देण्यासाठी माझी संपत्ती विकावी, असा प्रस्ताव मी कर्नाटक हायकोर्टाकडं मांडला होता. मात्र, बँका असं का करत नाहीत? या पैशाचा उपयोग बँकांना जेट एअरवेज वाचवण्यासाठी होईल, असं माल्या यांनी म्हटलं आहे
कर्जात अडकलेल्या विमान कंपनी जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नीने जेटच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. जेट एअरवेजला १५०० कोटी रुपयांची मदत मिळण्यासाठी या दोघांनी आपली पदे सोडली आहेत. या पार्श्वभूमीवर विजय माल्या यांनी ट्टिट करत आपली संपत्ती विकून जेटला वाचवावं असं आवाहन सरकारी बँकांना केलं आहे. माल्याने म्हटलं की, सरकारी बँका बेलआऊट पॅकेज देऊन जेटमधील नोकऱ्या वाचवण्याचा आणि जेटचं कामकाज सुरळीत राहण्याचा प्रयत्न करत आहेत हे पाहून मला आनंद वाटत आहे. किंगफिशरसाठीसुद्धा मी ही अपेक्षा केली होती.
दुसऱ्या ट्टिटमध्ये माल्यानं म्हटलं की, मी माझी कंपनी आणि कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी किंगफिशर एअरलाइन्समध्ये ४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. मात्र सरकारी बँकांनी एका चांगल्या विमान कंपनीला अपयशी होऊन दिले. एनडीए सरकारने माझ्याबाबत कपटीपणा दाखवला असा आरोपही माल्याने केला आहे.
हेही वाचा -
जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांचा राजीनामा