Advertisement

ठाण्यातील ५ हजार बेवारस वाहनांचा होणार लिलाव

गेल्या १५ दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. ठाण्यातील रस्त्यांवर १३८७ वाहने बेवारस स्थितीत आढळून आली आहेत. त्यापैकी १३६९ वाहनांवर नोटीस चिकटविण्यात आल्या होत्या.

ठाण्यातील ५ हजार बेवारस वाहनांचा होणार लिलाव
SHARES

रस्ते अडवून अनेक दिवस उभे असलेल्या बेवारस वाहनांच्या विरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी आता तीव्र कारवाई सुरू केली आहे. रस्ते आणि मोकळ्या भूखंडांवर असलेल्या तब्बल ५ हजार बेवारस वाहनांचा लिलाव वाहतूक पोलिस करणार आहेत. 

ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या आदेशानुसार ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी ही वाहने हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत रस्त्यांच्या कडेला बेवारस वाहने अनेक महिन्यांपासून धूळ खात उभी आहेत. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचं दिसून येत आहे. 

गेल्या १५ दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. ठाण्यातील रस्त्यांवर १३८७ वाहने बेवारस स्थितीत आढळून आली आहेत. त्यापैकी १३६९ वाहनांवर नोटीस चिकटविण्यात आल्या होत्या. त्यानंतर ९४५ वाहनमालकांनी वाहने रस्त्यावरून हटवली आहेत. तर वाहतूक शाखेने २३६ वाहने हटवली आहेत. उर्वरित ३८८ वाहनांच्या चेसी आणि रजिस्ट्रेशन क्रमांकाची माहिती संकलित करून ती माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठविली आहे. तेथून या वाहनांच्या मालकांचे पत्ते मिळाल्यानंतर त्यांना नोटीस पाठवली जाणार आहे.

सात दिवसांत मालक पुढे आले नाहीत, तर पुढील १५ दिवसांसाठी स्थानिक न्यायालयामार्फत जाहीर सूचना काढली जाणार आहे. त्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही तर या वाहनांचा लिलाव केला जाणार आहे. नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर (एनआयसी) पोर्टलवर या लिलावाची कायदेशीर प्रक्रिया नमूद केलेली आहे.

ठाण्यातील साकेत पोलिस मैदान, मुंब्रा, कल्याण, उल्हासनगर आणि भिवंडी या ठिकाणच्या डंपिंग ग्राउंडवर वाहतूक विभाग तसेच स्थानिक महापालिकांनी जप्त केलेली पाच हजार वाहने आहेत. त्यांचाही निपटारा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  महापालिकेने जप्त केलेली वाहने आणि वाहतूक विभागाने जप्त केलेली वाहने यांची वर्गवारी करून परिवहन विभागाच्या मदतीने या वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेण्याचे काम सध्या सुरू आहे. मूळ मालकांचा शोध घेऊन उर्वरित वाहनांचा लिलाव केला जाणार आहे.

बेवारस आढळलेल्या १३८७ पैकी सर्वाधिक ९८१ वाहने ठाणे शहरातील आहेत. त्या शालोखाल ३०३ वाहने कल्याण-डोंबिवली शहरांतील असून उल्हासनगर आणि अंबरनाथ येथे अनुक्रमे ४१ आणि ३७ वाहने आढळली आहेत. आरटीओकडे माहितीसाठी पाठवलेल्या ३८८ पैकी ५० वाहनांची माहिती वाहतूक शाखेला प्राप्त झाली आहे. त्यापैकी २९ वाहन मालकांच्या पत्त्यावर नोटिस पाठविण्यात आल्या आहेत. तर, ४५ वाहनांच्या चेसी आणि रजिस्टेशन क्रमांकाची माहिती मिळू शकलेली नाही.



हेही वाचा  -

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी १ हजार झाडांवर कुऱ्हाड

ई-चलन न भरल्यास लायसन्स होणार रद्द, दंड न भरलेल्या २ हजार जणांचे परवाने होणार रद्द


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा