Advertisement

धक्कादायक! मुंबईतील ७४ टक्के हाॅटेलमधील किचन अस्वच्छ

अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)ने विशेष मोहिमेअंतर्गत मुंबईतील ४४२ रेस्टाॅरंट-हाॅटेलची तपासणी केली असता त्यातील ३२७ रेस्टाॅरंट-हाॅटेलमधील किचन अस्वच्छ आढळल्याची माहिती शैलेश आढाव, सहआयुक्त, बृहन्मुंबई (अन्न), एफडीए यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

धक्कादायक! मुंबईतील ७४ टक्के हाॅटेलमधील किचन अस्वच्छ
SHARES

मुंबईकरांची ओळख खवय्ये अशी असून गाडीवरील वडापावपासून पंचतारांकित हाॅटेलमध्ये मुंबईकरांची ही खवय्येगिरी सुरू असते. त्यातही रेस्टाॅरंट-हाॅटेलमध्ये खाण्याऱ्यांची संख्या अधिक. पण मुंबईकरांनो, तुम्ही ज्या रेस्टाॅरंट-हाॅटेलमध्ये चवीचवीने खाता ते खाणं तुमच्या जिवावर बेतू शकतं. हो, कारण मुंबईतील ७४ टक्के रेस्टाॅरंट-हाॅटेलमध्ये तयार होणारं जेवण हे खाण्यास असुरक्षित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)ने विशेष मोहिमेअंतर्गत मुंबईतील ४४२ रेस्टाॅरंट-हाॅटेलची तपासणी केली असता त्यातील ३२७ रेस्टाॅरंट-हाॅटेलमधील किचन अस्वच्छ आढळल्याची माहिती शैलेश आढाव, सहआयुक्त, बृहन्मुंबई (अन्न), एफडीए यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


नियमांचं उल्लंघन

अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार रस्त्यावरील ठेल्यासह पंचतारांकित हाॅटेलमध्ये सर्व नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. त्यातही स्वच्छ जागी अन्नपदार्थ शिजवावेत आणि सर्व्ह करावेत हे अत्यंत महत्त्वाचं असतं. पण अनेक रेस्टाॅरंट-हाॅटेल मालकांकडून या कायद्याचं सर्रासपणे उल्लंघन केलं जातं. त्यानुसार एफडीएनं मुंबईसह राज्यभर विशेष मोहीम राबवित ४०२३ हाॅटेल-रेस्टाॅरंट तपासणीची मोहीम नुकतीच आखली होती. या मोहिमेत एफडीएनं ३०४७ रेस्टाॅरंट-हाॅटेलची तपासणी आतापर्यंत केली आहे.


ग्राहकांच्या जीवाशी खेळ

या तपासणीत रेस्टाॅरंट-हाॅटेल मालक कायद्याचं उल्लंघन करत ग्राहकांच्या जीवाशी खेळत असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. कारण राज्यभरात तपासणी करण्यात आलेल्या ३०४७ रेस्टाॅरंट-हाॅटेलपैकी तब्बल २६४९ रेस्टाॅरंट-हाॅटेलमधील किचन अस्वच्छ असून तिथं अन्न सुरक्षा कायद्याचं उल्लंघन केलं जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. म्हणजेच राज्यातील ८६.९३ टक्के रेस्टाॅरंट-हाॅटेल हे खाण्यासाठी योग्य नाहीत. मुंबईचा विचार करता मुंबईतील ४४२ रेस्टाॅरंट-हाॅटेलची तपासणी करण्यात आली असून यातील ३२७ रेस्टाॅरंट-हाॅटेल अस्वच्छ असल्याचं समोर आलं आहे. याची टक्केवारी ७४ टक्क्यांच्या घरात आहे.


हाॅटेलचं शटर डाऊन

या तपासणीनंतर एफडीएनं अन्न सुरक्षा कायद्याचं उल्लंघन करत ग्राहकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या मालकांना अखेर नोटीसा बजावल्या आहेत. अन्न सुरक्षा कायद्यानुसार आवश्यक ते बदल करत स्वच्छ जागेतच अन्नपदार्थ शिजवले जावेत, असे आदेश एफडीएने दिले आहेत. या नोटीशीनुसार जोपर्यंत आवश्यक ते बदल केले जात नाही तोपर्यंत मुंबईसह राज्यभरातील २६४९ रेस्टाॅरंट-हाॅटेलचं शटर डाऊन असणार आहे हे विशेष. त्यामुळे खवय्यांनो रेस्टाॅरंट-हाॅटेलमध्ये खायला जाताना जरा काळजी घ्या.



हेही वाचा-

मगनलाल चिक्कीचं उत्पादन थांबवण्याचे अादेश; एफडीएची कारवाई

भेसळखोरांना आता जन्मठेपेची शिक्षा



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा