राज्यातील अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांच्या मानधनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आॅक्टोबर २०१८ मध्ये दुपटीनं वाढ केली होती. मात्र, ही मानधनवाढ अंगणवाडी सेविकांना नोव्हेंबर २०१८ मध्ये मिळणं अपेक्षित होतं. परंतु, राज्य शासनानं ही मानधनवाढ अद्यापही लागू केलेली नसल्यानं त्याविरोधात राज्यातील अंगणवाडी सेविका जून महिन्यात मंत्रालयावर धडकणार आहेत.
मानधनात वाढ करा, सरकारी सेवेत सामावून घ्या, कर्मचाऱ्यांना मासिक ५ हजार रुपये पेंशन योजना लागू करा, अंगणवाडी केंद्राच्या कामासाठी रजिस्टर, अहवाल फॉर्म द्या, वर्षातून १५ दिवसांची आजारपणासाठी भरपगारी रजा, अंगणवाडी सेविकांची त्यांच्या इच्छेनुसार आवश्यक ठिकाणी रिक्त जागी बदली करा या अंगणवाडी सेविकांच्या प्रमुख प्रलंबित मागण्या आहेत.
आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी वारंवार आंदोलनं केली. या आंदोलनावेळी सरकारकडून सेविकांना फक्त आश्वासन मिळाली. मात्र, या आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्यानं अंगणवाडी सेविका संतप्त झाल्या असून, जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात प्रत्येक जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. या मोर्चानंतर देखील सेविकांना प्रतिसाद मिळाला नाही, तर ११ जून रोजी अंगणवाडी सेविका मंत्रालयावर विराट मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडणार असल्याचं समजतं आहे. या मोर्चात राज्याच्या विविध भागांतील २ लाख अंगणवाडी सेविका सहभागी होणार आहेत.
हेही वाचा -
गुरुवारी मुंबई आणि शुक्रवारी ठाणेकरांना अनुभवता येणार शून्य सावली
शिवडीत नागाच्या दंशामुळं सर्पमित्राचा मृत्यू