तब्बल 8 वर्षांनंतर म्हणजेच 2009 नंतर प्रथमच मुंबई महानगर पालिकेकडून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. 1388 पदांसाठी ही भरती होणार असून त्यासाठी महापालिकेकडून लवकरच ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. मात्र ही प्रक्रिया कशी असेल, याविषयी उमेदवारांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार असून राज्य शासन आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या महा ऑनलाईन लिमिटेड या कंपनीमार्फत ही संपूर्ण प्रक्रिया होणार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवण्यात आला आहे.
येत्या बुधवारी म्हणजेच 15 नोव्हेंबर रोजी स्थायी समितीमध्ये या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. ही मान्यता मिळाल्यानंतरच ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होईल. साधारणपणे 15 दिवस म्हणजेच 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज ऑनलाईन भरण्याची मुदत असणे अपेक्षित आहे.
याआधी चतुर्थ श्रेणी जागांसाठी शिक्षणाची अट शिथिल होती. आता मात्र या 1388 जागांसाठी 10 वी पास असण्याची अट घालण्यात येणार आहे. शिक्षणाची अट पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनाच ऑनलाईन अर्ज भरता येतील.
नोव्हेंबरमध्ये ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर डिसेंबरमध्ये अर्ज पडताळणी होऊन पात्र उमेदवारांना कॉल लेटर्स मिळणे अपेक्षित आहे. ज्यामध्ये परीक्षेसाठी उमेदवारांना बोलावले जाईल.
परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यास सांगितले जाईल. या कागदपत्रे सादर केल्यानंतर या उमेदवारांचे पोलिस व्हेरिफिकेशनही होईल. कागदपत्र पूर्ण असणारे आणि पोलिस व्हेरिफिकेशन पूर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्रे दिली जातील.
दरम्यान, ऑनलाईन अर्जप्रक्रिया ते नियुक्तीपत्र ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे 4 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या गणितानुसार साधारणपणे मार्च महिन्यापर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे.
सदर कामगार भरती प्रक्रियेसाठी महा ऑनलाईन संस्थेची नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीला सादर केला आहे. त्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर लगेचच ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होईल. तसेच, येत्या चार महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होईल.
सुधीर नाईक, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग
हेही वाचा