Advertisement

सार्वजनिक ठिकाणची गर्दी तातडीने थांबवा, उद्धव ठाकरेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी ठेवायची असेल, तर सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी तातडीने थांबवा, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

सार्वजनिक ठिकाणची गर्दी तातडीने थांबवा, उद्धव ठाकरेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
SHARES

महाराष्ट्रात (maharashtra) कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट अजूनही ओसरलेली नाही. त्यात तिसरी लाट येण्याची शक्यता देखील तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. अशातच सार्वजनिक ठिकाणी गर्दी देखील वाढत आहे. तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी ठेवायची असेल, तर सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी तातडीने थांबवा, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधिकारी तसेच उद्योग क्षेत्रातील काही प्रतिनिधींशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) म्हणाले, आपण कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा समर्थपणे मुकाबला केला. अजून दुसरी लाट ओसरली नाही तोपर्यंत तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या कमी झाली असली तरी ती अजूनही साडे आठ हजार ते ९ हजारावर स्थिरावली आहे, अजूनही ती त्या खाली जाताना दिसत नाही, उलट काही जिल्ह्यात रुग्णसंख्या पुन्हा वाढतांना दिसत आहे ही चिंतेची बाब आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेतील  आपल्याला हा जो मधला काळ मिळाला आहे त्यात तिसरी लाट येऊच नये यासाठी किंवा दुर्देवाने आलीच तर त्याची तीव्रता कमी राहील यासाठी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यात कोरोना आरटीपीसीआर चाचण्या वाढवा, पर्यटनस्थळी होणारी गर्दी तातडीने थांबवा, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

नियमांची कडक अंमलबजावणी 

कुठल्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ देऊ नका, रस्त्यावर फिरणारे नागरिक मास्क घालूनच फिरतील याची दक्षता घ्या,  ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे त्या क्षेत्राला कंटेंमेंट झोन जाहीर करून त्यात कोरोना (coronavirus) प्रतिबंधक नियमांचं कडक पालन करा, गाव, वाड्या वस्तींवर लक्ष केंद्रीत करा, कोरोनामुक्त गाव संकल्पनेत चांगले काम होईल यादृष्टीने प्रयत्न करा, कोरोना विषाणूमध्ये बदल दिसत असेल तर जिनोम सिकवेन्सी करून घ्या, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

मेहनतीवर पाणी नकाे

राज्याने एका दिवसात ८ लाख लोकांचं लसीकरण करून उच्चांक स्थापन केला असला तरी लस उपलब्धतेला मर्यादा आहे. त्यामुळे लसीकरणास विलंब होत आहे, काही नागरिकांना तर अजून पहिला डोसही मिळाला नाही अशा स्थितीत वाढती रुग्णसंख्या, डेल्टा विषाणूचा उद्भव आणि तिसरी लाट धोक्याची ठरू शकते हे लक्षात घ्या, आतापर्यंत घेतलेल्या मेहनतीवर पाणी पडू देऊ नका असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले तसेच शासन या सर्व कामासाठी आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली. 

हेही वाचा- विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायला सरकार का घाबरतंय, फडणवीसांचा सवाल

तिसरी लाट सुरू

मुख्यमंत्री यावेळी बोलताना पुढे म्हणाले की, आता जगातील अनेक देशात तिसरी लाट येण्यास सुरुवात झाली आहे, तसं जागतिक आरोग्य संघटनेने जाहीरही केलं आहे. ब्रिटनसारख्या देशात रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. ज्या देशात लसीकरण झालं त्या देशातही पुन्हा नव्याने रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. याचाच अर्थ लस घेतली असली तरी आपल्याला कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करणं आताच्याच कालावधीसाठी नाही तर पुढील एक दोन वर्षासाठी आवश्यक आहे. केंद्र सरकारनेही तिसऱ्या लाटेसंदर्भात सर्व राज्यांना तशा सूचना दिल्या आहेत.  

ऑक्सिजन निर्मिती वाढवा

राज्यात आजघडीला १३०० मे.टन ऑक्सिजन निर्मिती होते. दुसऱ्या लाटेत आपली गरज १७५० मे.टनापर्यंत वाढली होती म्हणजे साधारणत: ५०० ते ५५० मे.टन ऑक्सिजन आपण इतर राज्यातून मागवला. पण आता तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या ६० लाखापर्यंत राहील असा अंदाज केंद्राने व्यक्त केला आहे. तसंच दर दिवशी ४००० ते ४५०० मे.टन ऑक्सिजनची महाराष्ट्राला गरज लागेल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. ही परिस्थिती पहाता राज्यातील ऑक्सिजन निर्मितीला वेग द्यावा, राज्यातील ऑक्सिजन साठा पूर्ण क्षमतेने भरावा अशा सूचनाही त्यांनी केल्या. कुठल्याही परिस्थितीत राज्यात दररोज ३ हजार मे.टन ऑक्सिजन निर्मिती होईल यादृष्टीने ऑक्सिजन निर्मितीच्या कामाला गती देण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा