गोरेगावमधील टेक्निक प्लस वन या इमारतीनंतर प्रभादेवीतील ब्यू माँड या ग्लास फसाड अर्थात काचेच्या इमारतीला बुधवारी दुपारी आग लागली. या आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या आगीमुळे अग्निशमन दलाच्या अशा मर्यादेकडे लक्ष वेधलं गेलं आहे, ज्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास भविष्यात मोठी जीवितहानीही होऊ शकते. ही मर्यादा आहे उंच शिडी अर्थात स्नाॅर्केलची.
ब्यू माँड इमारतीच्या ३२ आणि ३३ मजल्यावर लागलेली आग वेळीच आटोक्यात आली. ही बाब खरं तर अग्निशमन दलासाठी दिलासादायकच म्हणावी लागेल. कारण अग्निशमन दलाकडे केवळ ३० व्या मजल्यापर्यंतच पोहोचू शकेल एवढ्या उंचीची स्नॉर्केल आहे. दुर्दैवाने ही आग जास्त भडकली असती आणि त्यात रहिवासी अडकले असते, तर अनेकांच्या जीवावरही बेतलं असतं. पण नशीब तसं झालं नाही.
पण, मुंबईत या पेक्षाही असंख्य टोलेजंग इमारती उभ्या आहेत. त्यापैकी एखाद्या ३० हून अधिक मजल्यांच्या इमारतीला आग लागल्यास अग्निशमन दलाचे जवान काय करणार? असा सवाल उपस्थित होत आहे. तर, दुसरीकडे उत्तुंग इमारतींच्या बांधकामांना परवानगी कशी दिली जाते? असा सवाल लोकप्रतिनिधींनी केला आहे.
मुंबई अग्निशमन दलाकडे सध्या ९० मीटर (ही शिडी ३० व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकते) , त्याखालोखाल ८१ मीटर आणि ७२ मीटर अशाप्रकारच्या उंच यांत्रिक शिड्या उपलब्ध आहेत. मुंबईत यापेक्षा उंच शिड्या वापरता येत नाही कारण उंचीवर हवेचा मारा जोरात होत असतो, त्यामुळे या शिड्या धोक्याच्या ठरू शकतात, असं सूत्रांचं म्हणणं आहे.
#MumbaiFire Update: More firefighters reach #BeaumondeTowers where the #fire broke out in #Prabhadevi; 5 more fire engines on spot#FireSafety #fireinmumbai #Worli #Mumbai pic.twitter.com/zqINBGn2z1
— Mumbai Live (@MumbaiLiveNews) June 13, 2018
उत्तुंग इमारतींना परवानगी देताना, त्यांना त्या इमारतींमध्ये अग्निशमन प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक टोलेजंग इमारतींना स्वत:ची आग प्रतिबंधक यंत्रणा राबवणं. प्रसंगी अग्निशामक दल सज्ज ठेवणं याबरोबरच काही महिन्यांची आग प्रतिबंधक यंत्रणांची तपासणी करणं हे आवश्यक आहे.
उंच इमारतींमधील आग विझवणं हे नेहमीच आव्हानात्मक असतं. या इमारतीच्या अंतर्गत भागांमधील आग प्रतिबंधक यंत्रणा तथा उपकरणं कार्यान्वित असल्यामुळे जवानांना आग विझवण्यास मोठी मदत झाली. त्यामुळेच ३२ व ३३ मजल्यापर्यंत लागलेल्या आगींसाठी केवळ ६ ते ८ फायर फायटींग जेट चालवू शकलो.
- प्रभात रहांगदळे, प्रमुख अधिकारी, मुंबई अग्निशमन दल
उत्तुंग इमारतींमध्ये अग्निशामक उपकरणांची योग्यप्रकारे देखभाल करून ती कार्यान्वित ठेवणं आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक इमारतींनी यातून धडा घेतला पाहिजे, असं आवाहन रहांगदळे यांनी केलं. उत्तुंग इमारतींमधील रहिवाशींनी आग प्रतिबंधक यंत्रणाबाबत जागरुकता दाखवल्यास अशाप्रकारच्या आगीच्या घटना उद्भवल्यास त्यावर त्वरीत नियंत्रण मिळवणं सोपं जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
हेेही वाचा-
'असं' आहे दिपिकाचं ब्यू माँड इमारतीतलं घर
६ वर्षांत लागलेल्या अागीत ३०० लोकांचा मृत्यू